गडचिरोली : राज्यात जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या स्थितीत असताना राजकीय पक्षांसमोर आता बंडाखोरीचे आव्हान उभे झाले आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेत महायुतीत फूट पडली असून भाजपचे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम उद्या २८ ऑक्टोबरला अपक्ष नामनिर्देशन दाखल करणार आहे. महायुतीकडून या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर गडचिरोलीत उमेदवारी नाकारल्याने भाजपचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी देखील बंडाखोरी करणार आहेत. गडचिरोली काँग्रेसमध्ये डॉ. सोनल कोवे अपक्ष लढणार असल्याची माहिती आहे.

आत्राम राजघराण्याचे वर्चस्व असलेल्या अहेरी विधानसभेमध्ये जागावाटपानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीकडून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांचे पुतणे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या गोटात प्रचंड अस्वस्थता आहे. अम्ब्रीश आत्रामांना संधी देण्यात यावी, अशी मागणी घेऊन समर्थकांनी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. पण उपयोग झाला नाही. त्यामुळे अम्ब्रीशराव आत्राम यांनी बंडाखोरीचा पवित्रा घेतला आहे. ते २८ ऑक्टोबररोजी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसकडून हणमंतू मडावी देखील उमेदवारीवर ठाम आहेत.

आणखी वाचा-हिंगणघाटमधून आघाडीचे अतुल वांदिले, तैलिक संघटनेच्या प्रभावाने वर्धा जिल्ह्यात तीन उमेदवार

गडचिरोली विधानसभेत भाजपकडून डच्चू मिळाल्यानंतर विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनी देखील अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी चालवली आहे. त्यांच्या समर्थकांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारीबद्दल पुनर्वीचार करावा अशी मागणी केली. तर गडचिरोलीत काँग्रेसकडून डावलण्यात आल्यानंतर इच्छुक असलेल्या डॉ. सोनल कोवे यांनी देखील अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली आहे. याठिकाणी काँग्रेसने मनोहर पोरेटी यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, दोन्ही पक्ष नेतृत्वाकडून सर्व पदाधिकाऱ्यांना आघाडी व युती धर्म पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा-महाराष्ट्रातील वाघिणीचे ओडिशात कृत्रिम स्थलांतर

भाजप ‘ॲक्शन’ मोडवर

महाविकास आघाडीपेक्षा बंडाखोरीचा सर्वाधिक फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे गडचिरोली आणि अहेरीतील हालचालीकडे विशेष लक्ष आहे. अहेरीत अम्ब्रीशराव आत्राम तर गडचिरोलीत विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मनधरणीचे प्रयत्न केल्या जात आहे. तरीही निर्णयावर ठाम राहिल्यास भाजप कडक भूमिका घेऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपच्या एका गटाकडून ‘मेक इन गडचिरोली’ घोटाळ्यात कारवाईची मागणी करण्यात आली. हे विशेष.