राज्यात विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीका टीप्पणी केली जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लक्ष करत विरोधकांचा पराभव करण्यासाठी लाडक्या बहिणी पुरेशा आहेत, असं विधान केलं आहे. तसेच सुनील केदार आणि नाना पटोलेंसारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी लाडक्या बहिणीच्या तोंडचा घास पळवण्याकरिता प्रयत्न केले, अशा आरोपही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. तत्पूर्वी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केलं.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आज नितीन गडकरी यांच्या नेतृत्त्वात नागपूरचा झालेला विकास लोक डोळ्याने बघत आहेत. राज्यात आम्हाला विकासासाठी केवळ ७ वर्ष मिळाली. या सात वर्षात आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या पूर्वीच्या १५ वर्षांपेक्षा जास्त काम केलं. जनतेच्या आशीर्वादाने मला मुख्यमंत्री होता आलं. विदर्भातही आपण मोठा परिवर्तन केलं. अनेक विकास प्रकल्प राबवले. त्यामुळे विदर्भाचही चित्र बदललं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने आम्ही नवमहाराष्ट्राची निर्मिती सुरु केली आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – Devendra Fadnavis : “८५+८५+८५ म्हणजे २७० हे गणित समजून घेण्याचा प्रयत्न सुपर कॉम्प्युटर आणि..”; देवेंद्र फडणवीसांचा मविआला टोला

“विरोधकांचा पराभवासाठी लाडक्या बहिणी पुरेशा”

यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केलं. “मी विरोधकांबाबत जास्त काही बोलणार नाही. विरोधकांचा पराभव करण्यासाठी लाडक्या बहिणी पुरेशा आहेत. ज्या लाडक्या बहिणीच्या तोंडचा घास पळवण्याकरिता सुनील केदार, नाना पटोलेंसारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी नागपूरच्या न्यायालयात याचिका दाखल केली. त्या लाडक्या बहिणीच त्यांना पुरून उरतील”, अशी टीका त्यांनी केली.

“सर्वांचे सरकार म्हणजे आपलं सरकार”

“आज राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज आणि मुलींना मोफत शिक्षण देतो आहे. दीन-दलित आदिवासी, वंचित घटकांसाठी आपण जे काम केलं. ते काम बोलते आहे. ओबीसी समाजासाठी ४८ अध्यादेश काढणारं हे महायुतीचं सरकार आहे. काँग्रसने त्यांच्या कार्यकाळात ओबीसींच्या विकासासाठी एकही अध्यादेश काढला नाही. पण आम्ही ओबीसींसाठी ५४ वसतीगृह बांधले. काँग्रेसने एकही वसतीगृह बांधलं नाही. आदिवासी समाजासाठी आम्ही स्वयंमसारख्या योजना आणून त्यांच्या मुलांना शिक्षण उपलब्ध करून दिलं. त्यामुळे सर्वांचे सरकार म्हणजे आपलं सरकार आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का; भुजबळ कुटुंबात बंडखोरी!

विजयाचा व्यक्त केला विश्वास

दरम्यान, पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या निवडणुकीत नागपूर दक्षिण पश्चिममधून विजयाचा विश्वासही व्यक्त केला. “या निवडणुकीत सहाव्यांदा मला दक्षिण पश्चिमची जनता मला आशीर्वाद देणार आहे”, असे ते म्हणाले.