सांंगली : कृष्णा वारणेचे बारमाही पाणी, कसदार जमीन यामुळे सधन असलेल्या वाळवा तालुक्यातील राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याभोवतीच गेल्या साडेतीन दशकांपासून केंद्रित झाले आहे. मुख्यमंत्रिपद मिळविण्याची इच्छा त्यांनी कधीही लपवून ठेवलेली नाही. यामुळे मतदारसंघातील विजय आणि तोही मोठ्या फरकाने हवा आहे. तथापि, सर्वोच्च पदाच्या शर्यतीत असल्याने या वेळी त्यांना महायुतीतील विरोधकाबरोबरच स्वपक्षीय व मित्र पक्षातील विरोधकाशी सामना करावा लागणार आहे.

कृष्णा खोर्‍यातील काळी कसदार जमीन ही जशी जमेची बाजू तशीच बारमाही सिंचन सुविधा ही शेती विकासात महत्वाची साधने या तालुक्यात आज निर्माण झालेली पाहण्यास मिळतात. वाळव्याच्या जमिनीत गवताला भाले फुटतात त्या प्रमाणे क्रांतीही अंगात भिनलेली आहे. बंड रक्तातच असल्याने राजकीय दृष्ट्याही हा तालुका सतत चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारकाना केवळ आश्रयच नव्हते तर जातीने क्रांतीच्या समरात सहभागी झालेले अनेक क्रांतिकारक या वाळव्याने दिले आहेत. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी हे एक त्यातील महत्वाचे नाव म्हणावे लागेल. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी या तालुक्याचे नाव जगभर केले. तर आधुनिक काळातील रॉबिनहूड म्हणून आयाबायांना आपला वाटणारा बापू बिरू वाटेगावकर याच तालुक्यातील. आचार्य जावडेकर, प्रा.एन. डी. पाटील आदी पुरोगामी विचारधारा जोपासत लोकचळवळीला बळकटी देणारे याच तालुक्यातील.

हेही वाचा – बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने राष्ट्रवादीला धक्का

साहित्यिक क्षेत्रात ज्यांचे नाव घेतल्याविना संस्कृतीचा श्रीगणेशाच होत नाही अशा सरोजिनी बाबर उर्फ अक्का याच तालुक्यातील बागणी गावच्या. खेड्यापाड्यातील महिलांच्या ओठी असलेल्या काव्यधारा, ओव्यांचा खजिना त्यांनी समाजासमोर आणला. मराठीतील मौखिक साहित्याचे सांस्कृतिक संचित त्यांनी आजच्या पिढीसाठी जतन केले. त्यांनीही विधानपरिषदेचे सदस्यत्व भूषविले. ग्राम्य म्हणून ओळख असलेल्या तमाशाला ज्यांनी विच्छा माझी पुरा करा या वगनाट्याद्बारे लोकनाट्याचा दर्जा मिळवून दिला ते वसंत सबनीस याच मातीतील. अशा या संपन्न तालुक्यात राजकारणही तितकेच तगडे आणि तोला-मोलाचे नसते तर नवलच म्हणावे लागेल. राजारामबापू पाटील, विलासराव शिंदे, नागनाथअण्णा नायकवडी आदींनी या तालुक्याचे प्रतिनिधीत्व केले.

राजारामबापू पाटील यांनी राजकीय नेतृत्व करत असतानाच सहकारातही आपला ठसा उमटवला. साखर कारखानदारी, दूध संस्था, पाणी संस्था या माध्यमातून गाव पातळीपर्यंत आपला संपर्क सतत राहील याची दक्षता घेतली. मात्र, आष्टा शहरात स्व. विलासराव शिंदे यांनी आपले वेगळे राजकीय अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना राज्य पातळीवर फारशी संधी मिळाली नाही. ती संधी बापूंना मिळाली. धरण खुजगाव की चांदोली यावरून राजारामबापू आणि वसंतदादा पाटील यांच्यातील राजकीय वाद गाजला होता. आजही हा वाद सुप्तावस्थेत सांगलीच्या राजकारणात कधी कधी डोके वर काढतो. मात्र बापूंच्या पश्‍चात दादांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर तालुक्याची जबाबदारी सोपवत त्यांच्या राजकीय कर्तबगारीची मुहूर्तमेढ रोवली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

यावेळी महाविकास आघाडीची उमेदवारी आमदार पाटील यांनाच मिळणार हे स्पष्ट असताना मित्रपक्षातील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. शिवसेनाकडून (ठाकरे) ताकदीने उमेदवारीची मागणी झालेली नाही. मात्र, महायुतीत उमेदवारीसाठीचा संघर्ष अधिक तीव्र स्वरुपात होताना दिसतो आहे. महायुतीतून भाजपकडून माजी नगराध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील यांची प्रबळ दावेदारी असली तरी राहुल महाडिक, विक्रम पाटील आदींनीही उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. तसेच महायुतीतील शिवसेना (शिंदे) गटाकडूनही उमेदवारीसाठी आग्रह धरला जात असून जागा वाटपात ही जागा कोणाच्या पदरी पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, हुतात्मा उद्योग समूहाचे गौरव नायकवडी हे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाकडून उमेदवारीसाठी फारसा आग्रह दिसत नसला तरी महायुतीत अन्य दोन पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहण्यास मिळत आहे.

हेही वाचा – आजीकडून पायपीट, नातीसाठी वाहनांचा ताफा !

राज्यात २०१४ मध्ये सत्ताबदल होताच, युतीचे शासन सत्तेवर येताच त्यांना इस्लामपूर नगरपालिकेत धक्का बसला. स्थानिक पातळीवरील सर्व विरोधक विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत निशीकांत पाटील यांचा थेट नगराध्यक्ष निवडीत विजय झाला आणि आमदार पाटील यांचे उमेदवार स्व. विजय पाटील यांचा पराभव झाला. नगरपालिकेत एकहाती सत्ता असलेल्या आमदार पाटील यांच्या गडाला सुरुंग लागला. यानंतर झालेल्या विधानसभेसाठी तिरंगी लढत झाली. युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला ही जागा आल्यानंतर सेनेचे गौरव नायकवडी हे मैदानात उतरले. तर माजी नगराध्यक्ष भोसले-पाटील यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी कायम ठेवली. या तिरंगी लढतीत आमदार पाटील यांचा विजय झाला असला तरी भोसले- पाटील यांनी घेतलेले मतदान लक्ष्यवेधी ठरले. या निवडणुकीमध्ये आमदार पाटील यांना १ लाख १५ हजार ५६३ तर निशीकांत पाटील यांना ४३ हजार ३९४ एकाकी लढत देऊन मते मिळाली आणि युतीकडून मैदानात उतरलेले शिवसेनेचे नायकवडी यांना ३५ हजार ५५८ मते मिळाली. आमदार पाटील यांच्या विरोधातील मतदान ८३ हजार २५६ असल्याचे स्पष्ट आहे. तथापि, संघटित विरोधकांचा अभाव हेच आमदार पाटील यांच्या आतापर्यंतच्या वर्चस्वाचे गुपित आहे असेच मानले जाते.

चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे आणि काँग्रेस यांच्यातील गोंधळाला कारणीभूत कोण याचे उत्तर आजतागायत मिळाले नसले तरी संशयाची सुई आमदार पाटील यांच्या भोवतीच घोंगावत आहे. काँग्रेसचे आमदार विश्‍वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्याशी आमदार पाटील यांचे उघड राजकीय वाद दिसत नसले तरी पडद्याआड एकमेकांची ताकद कशी कमी करता येईल असेच डावपेच आखले जातात. यामुळे आमदार पाटील यांनी सर्वोच्च पदासाठी मित्र पक्षांचे अडथळे दूर करण्याबरोबरच स्वपक्षातील अडथळेही दूर करावे लागतील.