लोकसत्ता टीम

नागपूर: देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. बहुमत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) आहे. एनडीएचे आणि भाजपाचे संसदीय नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमुखाने निवड झाली. त्यानंतर रविवारी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

विविध देशांचे पंतप्रधान, प्रतिनिधी हे या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा तिसरा कार्यकाळ कसा असेल हे पाहणे नक्कीच रंजक ठरणार आहे. तर नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-२ चा समारोपीय सोहळा सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता रेशीमबाग मैदानावर होणार आहे. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार असले तरी देशात भाजपच्या जागांमध्ये यंदा घट झाली आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर सरसंघचालक स्वयंसेवकांना काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा-खळबळजनक! बोगस बियाणे साठा पकडला, एकास अटक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दरवर्षी तृतीय संघ शिक्षा वर्ग नागपुरात आयोजित केला जातो. परंतु, यावर्षीपासून संघाकडून तृतीय संघ शिक्षा वर्ग अशा नावाऐवजी कार्यकर्ता विकास वर्ग -२ असे नाव असणार आहे. १६ मे पासून रेशीमबाग परिसरात या वर्गाला सुरुवात झाली असून देशभरातील ९३६ स्वयंसेवक या वर्गात सहभागी झाले होते. या कार्यकर्ता वर्गाचा समारोपीय सोहळा सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता रेशीमबाग मैदानावर होणार आहे. यावेळी श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सराला छत्रपती संभाजीनगरचे पीठाधीश रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे स्वयंसेवकांना उद्बोधन करणार आहेत. मोदींच्या शपथविधीनंतर डॉ. भागवत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा- PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात वर्णी लागलेल्या खासदारांचे देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन; म्हणाले…

घटलेल्या जागा, नड्डांच्या वक्त्यावर काय बोलणार?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपासाठी सर्वांत अनपेक्षित निकाल राहिला आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकांत बहुमताने विजय मिळविणाऱ्या भाजपाला यंदा ३०० चा आकडा मिळवण्यासाठीही मोठा संघर्ष करावा लागला. ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी २९३ जागांवर एनडीएला विजय मिळविता आला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधली सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भाजपाची संख्या घटली आहे. २०१९ मध्ये ३०३ जागांवर आघाडीवर असलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाने यावेळी केवळ २४० जागा जिंकल्या. बहुमतासाठी त्यांना आणखी ३२ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळेच आता घटक पक्षांचे महत्त्व वाढले आहे. त्याचेच प्रत्यंतर मोदींच्या भाषणादरम्यान येत आहे. तर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी निवडणुकीदरम्यान भाजपला आता संघाची गरज नाही, असे एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते. त्यामुळे या सर्वांवर सरसंघचालक काय बोलणार याकडेही अनेकांचे लक्ष आहे.