नागपूर: भारत हा भगवान राम, क्रृष्ण आणि शिवाजी महाराजांचा देश आहे. त्यामुळे औरंगजेब हा भारतात कुणाचा आदर्श असूच शकत नाही. तो क्रूर शासक होता. औरंगजेबासह जेवढेही क्रुर शासक भारतात झाले त्यांची कबर ठेवणे हे गुलामीचे लक्षण आहे. त्यांना आताही जपून ठेवण्यात काहीही अर्थ नाही. त्या काढून टाकायला हव्या, असे योगगुरू बाबा रामदेव म्हणाले.
नागपुरात पतंजलीच्या फूड पार्कच्या उद्घाटनासाठी आले असताना प्रसार माध्यमांशी संवाद साधताना रामदेव बाबा बोलत होते. बाबर, अकबर, औरंगजेब या सगळ्यांनी भारतात क्रुरता पसरवली. आपल्या आया-बहिणींना त्यांनी बेअब्रू केले. आपल्या देशाची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला. अशी माणसे आपला आदर्श असूच शकत नाहीत. आपला सगळ्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, औरंगजेब आमचा आदर्श असूच शकत नाही, असे योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवरही रामदेव बाबांनी भाष्य केले. ट्रम्प यांनी ‘टेरिफ टेररिझम’चा नवीन पायंडा पाडला आहे. त्यांनी लोकशाही पायदळी तुडवली आहे. ते वर्ल्ड बँकचेही ऐकत नाहीत. डॉलरची किंमत वाढवली. गरीब विकसनशील देशांच्या पैश्यांची किंमत कमी करून एक प्रकाराने आर्थिक दहशतवाद डोनाल्ड ट्रम्प चालवत आहेत.
ट्रम्प, पुतीन, शी जिनपिंग यांचा भरवसा नाही. काही शक्तीशाली देश जगाला विनाशाकडे नेण्याचे काम करीत आहेत. त्यासाठी भारतीयांनी एकजुटीने सशक्त राष्ट्र निर्माण करत विध्वंसक ताकदीला उत्तर दिले पाहिजे, असे आवाहन रामदेवबाबांनी केले. रामदेवबाबांनी याच वेळी फूड पार्कवरही भाष्य केलं. या फूड पार्कची रोजची क्षमता ८०० टन इतकी आहे. यातून नैसर्गिक पद्धतीने ज्यूस तयार करून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समृद्धी मिळणार आहे. आज संत्र्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या पद्धतीचे रोपे तयार करण्यासाठी नर्सरी तयार करू. अन्य प्रकारची जी फळं आहेत, त्यांचाही नैसर्गिक पद्धतीने ज्यूस काढण्याचं काम करू. संत्री निर्यात करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू. विदर्भला लागून गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान लगतच्या राज्यातून संत्रा आणण्यासाठी जाऊ, असं सांगतानाच जय जवान, जय किसान, जय मिहान हे महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करू, असंही रामदेवबाबा म्हणाले.