नागपूर : बदलापूर प्रकरणातील लहान मुलींच्या अत्याचारातील आरोपीला सुरुवातीला फाशी दिली पाहिजे अशा पद्धतीची मागणी विरोधकांकडून केली जात होती. आता मात्र पोलिसांनी स्वसुरक्षेसाठी त्याला मारले तर आरोपीची बाजू घेत आरोप केले जात आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांवर यांचा विश्वास नाही. आता गुन्हेगाराच्या सुरक्षेबाबत ते चिंता करत वक्तव्य करत आहे. महाविकास आघाडीचे नेते दुतोंडी आहे, अशी टीका राज्याचे वनमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

सुधीर मुनगंटीवार मंगळवारी सकाळी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. बदलापूर प्रकरणातील आरोपीविरोधात पोलिसांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलले आहे. त्यात नराधमाला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला तर त्याचे वकीलपत्र घेऊन आता महाविकास आघाडीचे सगळे नेते फिरत आहे, अशी टीका त्यांनी केली. अशी एन्काऊंटरची घटना घडली की तेव्हा आपोआप त्या प्रकरणाची चौकशी होते. ज्यांनी राज्य चालवले त्यांना कायदेशीर शिष्टाचार माहीत नाही का, देवा यांच्यापासून महाराष्ट्र वाचव अशी उपरोधीक टीका त्यांनी केली. तो दृष्ट बुद्धीचा बलात्कारी होता, त्याने पोलिसांवर हल्ला केल्यावर त्याच्यावर सहानुभूती दाखविण्याचा प्रयत्न विरोधक करत आहे, प्रत्यक्ष उपस्थित नसताना सहानुभूती व्यक्त करतात हे आश्चर्यकारक आहे. पोलिसांवर विश्वास ठेवायचा नाही का, पोलीस राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही. केवळ मतांसाठी विरोधक काय करतील याचा भरोसा नाही अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा – “तांत्रिक कारणांमुळे न्याय पराभूत होता कामा नये”, रितू मालू प्रकरणी सत्र न्यायालय म्हणाले…

महाविकास आघाडीमध्ये ई मुख्यमंत्र्यांची संख्या वाढली आहे. सभा असली तर फक्त टीका करण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे. काँग्रेसने केवळ फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम केले आहे. त्यांचे सरकार असताना असमानता आली नाही. आता समानता आणण्याचा आव आणत आहे. यांचा बाप आला तरी आरक्षण बंद करू शकणार नाही. भाजपचा कार्यकर्ता त्यासाठी जीव देईल असेही मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा – नागपूर : वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर वनमंत्री म्हणतात, “उपाययोजना…”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवडणुकीच्या निमित्त पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत कानमंत्र देण्यासाठी येणार आहे. कान उघडण्यासाठी नाही. कार्यकर्त्यांमध्ये उर्जा वाढवण्याचे काम ते करणार आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सवंग लोकप्रियतेसाठी ते संघावर आरोप करत असतात. त्यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली असून त्यासाठी त्यांनी बाशिंग बांधले आहे अशी, टीका त्यांनी केली. अजित पवार महाविकास आघाडीमध्ये येणार असा खोटा नेरेटीव्ह पसरविला जात आहे. त्याचा खोटेपणा लोकसभा निवडणुकीनंतर जनतेच्या लक्षात आला आहे असेही मुनगंटीवार म्हणाले. सांस्कृतिक धोरणामध्ये दहा बाबींवर तरतुदी केल्या आहेत. ज्या आदिवासी कालावंताचा समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.