भंडारा : मध्यप्रदेशातून लग्न आटोपून गावाला परत येत असताना दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात नवरा, बायको आणि ५ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिना गंभीर जखमी आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी ते पाथरी मार्गावर घडली.

प्राप्त माहितीनुसार, चिखला (माईन) येथील कैलाश मरकाम त्याची त्याची पत्नी पार्वता कैलाश मरकाम, शेजारी राहणाऱ्या सुषमा दुर्गाप्रसाद कंगाली आणि तिची पाच वर्षाची मुलगी यामीनी दुर्गाप्रसाद कंगाली हे चौघे दुचाकीने मध्यप्रदेशातील बोनकट्टा येथे लग्न सोहळ्यासाठी गेले होते. लग्न कार्य पार पडल्यावर ते रात्री स्वगावी परतत असताना रामनगरजवळ ही दुर्दैवी घटना घडली.

नाकाडोंगरी जवळील चांदमारा येथे मध्यप्रदेशातील हेटी गावाहून आलेल्या वरातीमध्ये छतेरा येथील बोलेरो वाहन (चालक – दिनेश गौपाले) सहभागी झाले होते. माहितीप्रमाणे, चालकाने लोभीजवळ एका इसमास धडक दिली, ज्यामुळे संबंधित इसमाने जीव वाचविण्यासाठी धाव घेतली. या गोंधळात बोलेरो सुसाट मध्यप्रदेशकडे निघालाी यातचं रामनगर जवळ या वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला आमोरा समोर जबर धडक दिली.

या भीषण अपघातात कैलास मरकाम (४२), पार्वता मरकाम (३६),यामिनी कंगाली (५) अशी मृतांची नावे आहेत. तर सुषमा दुर्गाप्रसाद कंगाली वय ३० वर्ष रा. चिखला या ही गंभीर जखमी असून तिला भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याची माहिती आहे.

या अपघातामागे रस्त्याचे अपूर्ण आणि असुरक्षित बांधकामही एक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. राजापूरपासून सुरू असलेल्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गिट्टी टाकलेली असून, तेथे कोणतीही सुरक्षाव्यवस्था नाही. रात्रीच्या अंधारात चेतावणी फलक, रेडीयम संकेत अथवा प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो. सदर कंत्राटाचे काम तिरोडा येथील एका कंत्राटदाराकडे असून, याप्रकरणी योग्य ती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.

अपघातानंतर कारचालक घटनास्थळी वरून पसार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. फिर्यादी विजय सोमा कंगाली यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार मंगेश पेंदाम, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गीते या प्रकरणाचा तपास करत आहेत. तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे चिखला गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.