भंडारा : राज्यात मागील काही दिवसांपासून ‘महिला मुख्यमंत्री’ हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळू शकते का? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना भंडारा जिल्ह्यालाही आता ‘महिला आमदारा’चे डोहाळे लागले आहेत. सध्या समाजमाध्यमांवर ‘अब की बार महिला आमदार’ अशा पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहेत तर साकोलीतही ‘भावी महिला आमदार’ असे बॅनर झळकू लागले आहे. उल्लेखनीय म्हणजे आजवर जिल्ह्यात एकही महिला आमदार झालेली नाही.

विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यातच भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. कधी नव्हे ते यावेळी जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात इच्छुक महिलांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. एवढेच नाही तर या महिलांच्या नावाने आता भावी महिला आमदार असे बॅनर्स आणि पोस्टसुद्धा झळकू लागल्या आहेत. तुमसर मतदारसंघात भाजपच्या कल्याणी भुरे, साकोली विधानसभा क्षेत्रात भाजपच्या डॉ. विजया नंदुरकर, डॉ. मनीषा निंबार्ते, भंडारा क्षेत्रात पूजा ठवकर या महिलांनी विधानसभेसाठी कंबर कसली असून आपापले विधानसभा क्षेत्र पिंजून काढत आहेत. विशेष म्हणजे या तीनही विधानसभा क्षेत्रात चर्चेत असलेल्या तगड्या आणि मातब्बर इच्छुक पुरुष उमेदवारांचे आवाहन समोर असताना त्यांना टक्कर देण्यास या महिला सज्ज आहेत. असे असले तरी राजकारणात आजही असलेली पुरुषांची मक्तेदारी, महिलांच्या जिंकण्याच्या आणि जबाबदारी पेलण्याचा क्षमतेवर उपस्थित केले जाणारे प्रश्नचिन्ह, राजकीय दृष्ट्या पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी लेखून उमेदवारी न देणे अशा अनेक कारणांमुळे या महिलांचा मार्ग अजूनही खडतर असल्याच्या प्रतिक्रिया या इच्छुक महिलांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना व्यक्त केल्या. या निवडणुकीत महिलांना संधी देण्याचा विचार पक्षाने करावा अशी सुप्त इच्छाही या महिलांनी बोलून दाखविली.

हेही वाचा – काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना लोकसभा निवडणुकीपासून वंचित ठेवणारा निर्णय अवैध

केवळ “स्त्री” असल्यामुळे तिकिटीसाठी संघर्ष…

भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्याणी भुरे या तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. कल्याणीताई म्हणतात की, ‘लाडकी बहीण’ सारख्या योजना आणून भाजप सरकार महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करीत आहे. मात्र या महिलांचा आवाज संसदेत आणि विधिमंडळात मांडण्यासाठी निवडणुकीत महिलांना नेतृत्व करण्याची संधी का दिली जात नाही हे अनाकलनीय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण मिळाले आहे, पण विधानसभा आणि लोकसभेतही ते मिळाले तर जास्तीत जास्त महिलांना संधी मिळेल. मी राजकारणात शून्यातून विश्व निर्माण केले आहे आहे, २०११ पासून विधानसभेचे तिकीट मिळविण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे, मात्र केवळ एक स्त्री असल्यामुळे तिकिटासाठी मला मागील १२ वर्षांपासून संघर्ष करावा लागत असल्याची सलही कल्याणी भुरे यांनी बोलून दाखविली.

आजही पुरुषांची मक्तेदारी..

महिलांना समान हक्क मिळण्याची चर्चा होत असली तरी राजकारणात हे चित्र फारसे समाधानकारक दिसत नसल्याचे मत भाजपच्या जिल्हा सचिव डॉ. विजया नंदुरकर यांनी व्यक्त केले. कितीही समानता म्हटली तरी राजकारणात आजही पुरुषांची मक्तेदारी आहे. आमचा पक्ष महिलांना उमेदवारी देण्यासाठी सतत आग्रही भूमिका घेतो. पण महिला उमेदवारांमध्ये जिंकण्याच्या आणि जबाबदारी पेलण्याच्या क्षमतेवर विचार केला जातो. साकोली विधानसभा क्षेत्रात आजपर्यंत कोणत्याही पक्षाने महिलांना उमेदवारी दिली नाही. विधानसभा आणि लोकसभेत प्रतिनिधित्व करू शकणाऱ्या महिला नेत्यांची कमतरता नाही, परंतु पुरुषांचे वर्चस्व असल्याने आम्हा महिलांना संधी मिळत नाही. जर महिलांना संधी दिली. तर महिलांचे मतदान त्या पक्षाकडे निश्चितपणे आकर्षित होणार असा विश्वास विजया ताईंनी बोलून दाखविला.

हेही वाचा – अमित शहा नागपुरात, गडकरी काश्मिरमध्ये, तर्कवितर्कांना ऊत

संधी मिळालीच नाही तर सिद्ध कसे करणार ?

काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते यांचे काल साकोली विधानसभा क्षेत्रात ‘भावी महिला आमदार’ असे बॅनर्स झळकले. थेट नानांना आवाहन देणाऱ्या काँग्रेसच्या मनीषा ताईंना याबाबत विचारले असता त्या म्हणतात की, माझ्या काही चाहत्यांनी तसे बॅनर्स लावले. तरीही आता पक्ष श्रेष्ठींनी संधी आणि जबाबदारी दिली तर जिल्ह्याला यावेळी महिला आमदार नक्की मिळणार! कुठलाही राजकीय वारसा नसताना मी राजकारणात आले आणि सक्षमपणे काम करत आहे. महिलांना संधी देण्यापेक्षा प्रत्येक जागा निवडून आणणं हे राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचं झाले आहे. पण जर तुम्ही त्या महिलेला संधीच दिली नाही तर ती जिंकू शकते हे कसे सिद्ध करणार?” असा प्रश्नही मनीषा निंबार्ते यांनी उपस्थित केला.

स्त्रियांसाठी राजकारणातला संघर्ष मोठा

याबतबत माजी खासदार सुनील मेंढे यांच्या सुविद्य पत्नी शुभांगी मेंढे म्हणतात की, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला ६४ वर्षे झालीत मात्र महाराष्ट्राला आजवर एकही महिला मुख्यमंत्री मिळाली नाही तसेच भंडारा जिल्ह्याच्या इतिहासात आजवर एकही महिला आमदार झालेली नाही. महिलांच्या बाबतीत तिच्या बुद्धिमत्तेपेक्षा ती हे करू शकेल का? तिला हे पेलता येईल का इथपासून विचार केला जातो. प्रत्येक क्षेत्रात जशी स्पर्धा असते तशी राजकारणातसुद्धा आहे. पण राजकारणातला संघर्ष हा खूप जास्त आहे. जिला घराणेशाहीची पार्श्वभूमी नाही अशा सामान्य घरातल्या महिलेने चौकट मोडून राजकारण येणे हे इंद्रधनुष्य पेलविण्यापेक्षा कमी नाही.