लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागपुरातील पहिल्याच कार्यक्रमाने भाजप व देवेंद्र फडणवीसांची पळता भुई थोडी झाली असून घाबरलेल्या फडणविसांचे ताळतंत्र बिघडले आहे. त्यामुळे राहुल गांधींवर खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हिंदू धर्मात लाल रंग शुभ मानला जातो पण भाजपाला तो ही अपवित्र वाटू लागला आहे, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या संविधान सन्मान संमेलनावर टीका केली. ते म्हणाले, संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्यांना एकत्र करून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. अर्बन नक्षलवादाचा हा प्रयत्न आहे. भारत जोडो हा समूह तयार करण्यात आला आहे. या समूहामध्ये अनेक संघटना अतिशय डाव्या विचारांच्या आहेत. एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. पण लाल संविधानच का? लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहात, असा प्रश्न त्यांनी केला होता.

आणखी वाचा-“अल्पसंख्याकांच्या मतांसाठी ठाकरेंनी बाळासाहेबांना … ” काय म्हणाले फडणवीस

फडणवीसांना प्रत्युत्तर देतांना पटोले म्हणाले, राहुल गांधी संविधान ‘बचाओ’ची भूमिका हाती घेत संविधानाचे पुस्तक दाखवत असतात. ज्या लोकांनी आरक्षण व संविधानाला विरोध केला, संविधान जाळले त्या व्यवस्थेच्या बाजूला भाजपच्या शक्तीस्थळाजवळच सुरेश भट सभागृहात राहुल गांधींचा संविधान सन्मान संमेलन झाले. त्यामुळे भाजपचा जळफळाट झाला आहे.

भाजपला डाव्या विचारसरणीचे लोक देशाचे विरोधक वाटत असतील तर केरळमध्ये डाव्या पक्षाचे सरकार आहे, पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षे डाव्या पक्षांचे सरकार होते, देशात आजही डाव्या पक्षाचे आमदार, खासदार आहेत, त्यांना मतदान करणारे देशविरोधी आहेत का? आणि भाजपाला तसे वाटत असेल तर केंद्रात त्यांची सत्ता आहे, फडणविसांनी कारवाई करावी. कोणालाही देशभक्तीचे किंवा देश विरोधाचे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार भाजपाला कोणी दिला, असा सवाल फडणवीसांनी विचारला.

आणखी वाचा-नागपूर : आजनी पोलीस ठाण्यातून आरोपी पसार

संविधानाच्या मुखपृष्ठाचा रंग लाल, पिवळा का काळा असावा हे ठरविण्याचा अधिकार संविधान विरोधी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना नाही. संविधान वाचवणे भाजप व फडणविसांना शहरी नक्षलवाद वाटतो का? भारत जोडो यात्रेत राहुल यांच्यासोबत चालणारी मराठी माणसे शहरी नक्षलवादी आहेत का असा सवाल विचारून फडणवीसांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची माफी मागावी, असा हल्ला नाना पटोले यांनी केला आहे.

भाजपची सर्वात मोठी अडचण राहुल गांधी हे आहेत. भाजप राहुल गांधी यांना घाबरत असून मनुवादी विचारसरणीचे हे लोक त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. पण राज्यातील जनता सुज्ञ आहे भाजपाला ते त्यांची जागा दाखवतील, असेही पटोले म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp and rss cannot decide what colour is the page of constitution says nana patole rbt 74 mrj