लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघातील तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेवर पोहोचली. मतदारसंघात ६१.७९ टक्के अंतिम मतदान झाले असून यंदा १.६१ टक्के मतदान वाढले. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक मतदान झाले. वर्चस्व कायम राखण्याचा दावा भाजप उमेदवारांकडून केला जात आहे, तर काँग्रेस व वंचित आघाडीच्या उमेदवारांना यंदा परिवर्तन घडून येण्याची आशा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. १८ लाख ९० हजार ८१४ मतदारांपैकी ११ लाख ६८ हजार ३६६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अकोल्यात परंपरेपुरसार यंदा देखील तिरंगी लढत झाली. भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचित आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात अटीतटीचा सामना आहे.

आणखी वाचा-भंडारा : डॉ. प्रशांत पडोळे म्हणतात, ‘एक्झिट पोल’ जनतेचा नसून भाजपप्रणित, केवळ सायकॉलॉजिकल वारफेअर…’

दरम्यान, भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी भाजपच विजयी होण्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड आहे. गेल्या चार निवडणुकांमध्ये भाजपने आपले निर्विवाद वर्चस्व राखले. यावेळेस देखील भाजप मोठ्या मताधिक्याने विजयी होईल. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची मतदारसंघात प्रभावी अंमलबजावणी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा, असंख्य लाभार्थी, मतदारंघात झालेले विकास कार्य, मजबूत संघटन आदी भाजपच्या जमेच्या बाजू आहेत.

काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी यंदा अकोला मतदारसंघात परिवर्तन घडून येईल, असा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडीची अकोल्याची जागा चांगल्या मतांनी निघणे अपेक्षित आहे. रिसोड, अकोट, अकोला पश्चिम आणि बाळापूर मतदारसंघामध्ये काँग्रेसला मोठे मताधिक्य मिळेल. अकोला पूर्व व मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये देखील भाजपपेक्षा काँग्रेसला अधिक मते मिळण्याची अपेक्षा आहे. ६० ते ८० हजाराचे मताधिक्याने जागा निवडून येईल. मतदारसंघात परिवर्तनाचे वारे दिसून येत आहेत, असे डॉ. अभय पाटील म्हणाले.

आणखी वाचा-अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या सुटकेबाबतच्या निर्णयाला ‘सर्वोच्च’ न्यायालयाची स्थगिती…

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील विजय होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. मतदारसंघात गेल्या दोन दशकांपासून प्रस्थापितांचे वर्चस्व राहिले. मतदारसंघातील विकास खुंटला असून अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले. सर्व स्तरावरच्या मतदारांमधून वंचितला मोठा प्रतिसाद मिळाल्याने यावेळेस वंचितचा विजय निश्चित आहे, असे ते म्हणाले.

अकोला मतदारसंघातील प्रमुख तिन्ही उमेदवारांकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत असला तरी निकाल काय लागतो, हे उद्या, ४ जूनला दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कुणाचा गुलाल उधळणार व कुठल्या उमेदवारांची निराशा होणार, हे पुढील काही तासांत निश्चित होईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp claims supremacy congress and the vanchit bahujan aghadi hope for change ppd 88 mrj
Show comments