नागपूर शहर भाजपचे ‘वैभव’ मुन्ना यादव सध्या चर्चेत आहेत. तसेही ते व त्यांचे कुटुंबीय अधूनमधून चर्चेत असतातच. कुणाला तरी मारहाण, धमकी हे कारण या चर्चेत राहण्यासाठी त्यांना पुरेसे असते. थेट मुख्यमंत्र्यांच्या भाषेत सांगायचे तर, ही मारहाण व धमकी राजकीय कारणासाठी असते, त्यामुळे यातून दाखल होणारे गुन्हे राजकीय असतात. तर आता यादव चर्चेत येण्याचे कारण काँग्रेसचे नेते नारायण राणे आहेत. राणेंच्या आरोपामुळे उत्साहित झालेल्या एका यादवपीडिताने येथे चक्क उपोषण सुरू केले, त्यामुळे यादवांचे चर्चेत असणे जरा लांबत चालले आहे. मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक असलेले यादव तसे सभ्य व सुसंस्कृत गृहस्थ आहेत. साधनसुचिता हाच त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. लोकशाही व कायदेपालनावर अपार निष्ठा असलेल्या या ‘स्वच्छ’ यादवांना म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी घरबांधणी कामगार मंडळाचे अध्यक्षपद बहाल केले. या शहरात भाजपचे अनेक नेते, आमदार आहेत. मात्र, त्यांची पाश्र्वभूमी चांगली नसल्याने राज्यकर्त्यांकडून यादवांना प्राधान्य देण्यात आले. आता हेच यादव गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, असा ‘जावईशोध’ राणेंनी लावला. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे असल्याचा राणेंचा आरोप आहे. या आरोपाला बळ मिळावे म्हणून येथील संविधान चौकात उपोषण सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी यादवांना स्वच्छतेचे प्रमाणपत्र बहाल केले व त्यांच्यावरील गुन्हे राजकीय कारणांसाठीचे आहेत, असे स्पष्टीकरण दिले असले तरी उपोषणाच्या या कृतीमुळे उठलेला चर्चेचा धुरळा काही खाली बसायला तयार नाही, त्यामुळे यादव कसे चांगले आहेत, हे सांगणारी एक फौजच भाजपच्या वतीने मैदानात उतरली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा