नागपूर : उपराजधानीमधील पश्चिम नागपूर आणि ग्रामीणमधील उमरेड या दोन जागांचा तिढा भाजपमध्ये होता. उमेदवार कोण असणार याबाबत अनिश्चितता होती. पहिल्या दोन यांद्यांमध्ये या मतदारसंघातील उमेदवारांचे नाव नसल्याने घोळ अधिक वाढला होता, कार्यकर्त्यांचा संयम सुटू लागला होता. अखेर पश्चिम नागपूरमध्ये भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांचे तर उमरेडमध्ये माजी आमदार सुधीर पारवे यांचे नाव निश्चित केले आहे. पश्चिमच्या नावामुळे भाजपमध्ये असंतोष होऊ शकतो.

भाजपने पहिल्या यादीत पाच उमेदवार जाहीर केले होते. त्यात तीन शहरातील व दोन ग्रामीणमधील होते. त्यामुळे शहरातील मध्य आणि पश्चिम तर ग्रामीणमधील सावनेर, उमरेड आणि काटोल विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची प्रतीक्षा होती. पश्चिम नागपूर सध्या काँग्रेसकडे आहे. विद्यमान आमदार विकास ठाकरे यांना पक्षाने पुन्हा रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात कोणता उमेदवार द्यायचा याबाबत भाजपमध्ये एकमत होत नव्हते. या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी, हिंदी भाषिकांकडून माजी मपौर दयाशंकर तिवारी आणि महिला म्हणून माजी महापौर नंदा जिचकार यांची नावे पुढे येत होती. मात्र चर्चेतल नावे बाजूला सारत भाजपने दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेवदारी देण्याचे निश्चित केले आहे. कोहळे हे २०१४ मध्ये दक्षिण नागपूर मतदारसंघातून भाजपकडून विजयी झाले होते. २०१९ मध्ये त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे तेते नाराज होते. ते यावेळी २०२४ साठी त्यांनी दक्षिणमध्ये प्रयत्न सुरू केले होते. पण तेथे भाजपने विद्यमान आमदार मोहन मते यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कोहळे यांना पश्चिममध्ये पाठवण्यात आले. पश्चिम हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. २०१९ मध्ये त्याला काँग्रेसने छेद दिला होता. त्यामुळे तो परत मिळवण्यासाठी पक्षाचे प्रयत्न राहतील. पण कोहळे मतदारसंघाबाहेरील असल्याने स्थानिक भाजप नेते त्यांना कसे सांभाळून घेतात हा प्रश्न आहे.

हेही वाचा >>>‘हयांना जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा’…..व्हिडीओतील उपरोधाच्या बाणांनी महायुतीवर…

दरम्यान उमरेडमध्ये २०१९ मध्ये काँग्रेसकडून पराभूत उमेदवार सुधीर पारवे यांना भाजपने यावेळी पुन्हा संधी दिली आहे. पारवे यांचा मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे राजू पारवे यांनी पराभव केला होता. पण राजू पारवे लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाचा व विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शिवसेनेत गेले व लोकसभा निवडणूक लढले पण त्यातही ते पराभूत झाले होते.