नागपूर : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत केलेली आघाडी अनैसर्गिक असून त्यामुळे त्यांचे सध्या हाल बेहाल होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, की ज्या दिवशी शिवसेना काँग्रेसकडे जाईल, त्या दिवशी मला पक्ष बंद करावा लागेल. आज तीच वेळ आली आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. आमची शिवसेनेसोबत नैसर्गिक युती होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी वंदनीय होते. मात्र, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला जवळ केले. मात्र काँग्रेस त्यांना जवळ करणार नाही तसेच त्यांना सहनही करणार नाही. उद्धव ठाकरे महायुतीमध्ये असताना विदर्भात आम्ही त्यांना सन्मानजनक जागा देत होतो. मात्र, आज त्यांची परिस्थिती बघवत नाही. यासाठी उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, असे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा : नक्षलवाद्यांच्या गड अबुझमाडमध्ये गडचिरोली पोलिसांची पहिल्यांदाच मोठी कारवाई, मृत नक्षल्यांची ओळख पटली

अनिल देशमुख यांच्या पुस्तकाबद्दल …

अनिल देशमुख यांचे पुस्तक येऊ घातले आहे. त्यात भाजप नेत्यांबाबत अनेक गौप्यस्फोट असण्याची शक्यता आहे, याबाबत बावनकुळे म्हणाले,
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुस्तक स्वतः लिहिणे यात नवीन काही नाही. त्याला समाजाची मान्यता नसते. त्यांना भरपूर वेळ होता त्यामुळे वेळेचा सदुपयोग करत त्यांनी पुस्तक लिहिले.
एकनाथ शिंदे नाराज नाही

एकनाथ शिंदे नाराज नाराज आहे या केवळ प्रसार माध्यमांच्या बातम्या आहेत. ते नाराज नाही. त्यांच्याशी आमचा संवाद असून जागेच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी एकत्र निर्णय घेतले आहे. ८ ते १० जागेवर निर्णय झाला नाही मात्र आज किंवा उदयापर्यंत होऊ जाईल. देवेंद्र फडणवीस आणि मी एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले. पहिली यादी जाहीर करण्यात आली. आत दुसरी यादी लवकरच जाहीर करण्यात येईल. उमरेडची जागा भारतीय जनता पक्ष लढवणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा : नागपूर: शालिमार एक्स्प्रेस रुळावरून घसरली, प्रवासी जखमी

सावरकर पक्षाशी एकनिष्ठ

टेकचंद सावरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे असे विचारले असताना बावनकुळे म्हणाले, त्यांची काहीच नाराजी नाही. ते पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहे. आमदार म्हणून त्यांनी पाच वर्ष चांगले काम केले आहे. प्रचार यंत्रणा राबवताना त्यांची प्रमुख भूमिका राहणार असून कामठीमध्ये ते माझा प्रचार करणार असल्याचे
बावनकुळे यांनी सांगितले.

महायुतीत अडचण नाही

भाजपचे नेते व माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी अजित पवार गटात प्रवेश केला किंवाभाजपचे निलेश राणे यांनी शिंदे गटात प्रवेश करीत आहे. त्यामुळे महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. दोघेही सक्षम उमेदवार आहे. उमेदवार जात असेल तरी आम्हाला काहीच अडचण नसल्याचे बावनकुळे म्हणाले.