नागपूर : गेल्या महिनाभरापासून पालकमंत्रीपदाचा सुरू असलेला घोळ अखेर संपला. शनिवारी रात्री सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर करण्यात आले. यात विदर्भातील सर्व महत्वाचे जिल्हे भाजपने आपल्याकडे ठेवले असून शिवसेना (एकनाथ शिंदे) यांचा सन्मान राखण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी भाजपने नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, वर्धा, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवले आहे. राज्याची उपराजधानी नागपूर आणि अमरावती या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले. असे करून भाजपने विदर्भातील दोन्ही प्रमुख जिल्ह्यात आपलेच वर्चस्व राहील याची खबरदारी घेतली आहे.

आणखी वाचा-लग्नास नकार, आत्महत्येस कारण? शिक्षेबाबत उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय…

मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारले आहे. मुख्यमंत्री संपूर्ण राज्याचे पालक असतात. परंतु गडचिरोली हा जिल्हा नक्षलवादी कारवाया आणि आता पोलाद खनिजासाठी ओळखला जातो. या जिल्ह्यावर सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवले असावे, अशी चर्चा आहे. या जिल्ह्यातील खनिज संपत्ती आणि येऊ घातलेले पोलाद उद्याोग याचा व्याप मोठा आहे. हे बघता मुख्यमंत्र्यांच्या मदतीसाठी शिवसेनेचे अॅड. आशीष जयस्वाल यांना सहपालकमंत्री करण्यात आले आहे. सहपालकमंत्री हे पद राज्यात पहिल्यांदाच निर्माण करण्यात आले आहे. संजय राठोड यांना त्यांच्या गृह जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देऊन शिवसेनेचाही सन्मान कायम ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे.

चंद्रपूर, अकोला आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तुलनेने कमी अनुभवी मंत्र्याला देऊन मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या राकारणातही आपणच लक्ष घालणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. चंद्रपूर जिल्हास वाऱ्यावर सोडणार नाही, असे फडणवीस चंद्रपूर येथील एका कार्यक्रमात बोलले होते, हे येथे उल्लेखनीय.

आणखी वाचा-उपजिल्हाधिकारी, तहसीलदार होऊनही नियुक्ती न मिळाल्याने काहींचे लग्न मोडले तर काहींनी…

जिल्ह्याशी संबंध नसणारे पालकमंत्री

त्याच जिल्हयातील पालकमंत्री असला तर त्याचा जिल्ह्याचा राजकारणात हस्तक्षेप होत असतो. त्यामुळे भाजपने पालकमंत्री निवडताना त्याचाही विचार केल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांना विदर्भातील वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. अशाच प्रकारे भुसावळचे संजय सावकारे यांना भंडाऱ्याचे, वाईचे मकरंद जाधव यांना बुलढाणा आणि कराडचे बाबासाहेब पाटील यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

कोणत्या जिल्हयात कोण पालकमंत्री?

गडचिरोली- देवेंद्र फडणवीस, नागपूर-चंद्रशेखर बावनकुळे, अमरावती-बावनकुळे, वाशीम- हसन मुश्रीफ, यवतमाळ- संजय राठोड, चंद्रपूर- अशोक उईके, भंडारा-संजय सावकारे, बुलढाणा- मकरंद जाधव, अकोला- आकाश फुंडकर, गोंदिया-बाबासाहेब पाटील, गडचिरोली-अॅड. आशीष जयस्वाल (सह- पालकमंत्री), वर्धा-डॉ. पंकज भोयर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp retains all important districts of vidarbha in guardian minister post rbt 74 mrj