यवतमाळ : चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या विजयी झाल्या. प्रतिभा धानोरकर यांनी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांचा तब्बल दोन लाख ६० हजार मतांनी पराभव केला. आता निवडून आल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक काळातील आरोपांचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच धानोरकर यांनी केळापूर-आर्णी येथील भाजपचे आमदार संदीप धुर्वे यांनी आता मिशी काढून घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण करावी, असा टोला लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस व भाजपात चांगलेच वाकयुद्ध रंगले होते. या मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहे. गेल्यावेळी दिवंगत बाळू धानोरकर हे काँग्रेसचे येथील खासदार होते. त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार होत्या. प्रचारकाळात केळापूरचे भाजप आ. डॉ. संदीप धुर्वे यांनी पाच वर्षात खासदार बाळू धानोरकर यांनी आर्णी विधानसभेत कोणेतीही विकासकामे केली नाही. त्यामुळे विकासकाम दाखवा मी मिशी काढतो, अशी प्रतिज्ञा लोकसभा निवडणुकीच्या काळात केली होती. दरम्यान या मतदारसंघातून कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आल्या. नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचा खरपूस समाचार घेतला.

हेही वाचा – बुलढाणा : संगणक टंकलेखन परीक्षा घोटाळा उघडकीस, आठ जणांनी ‘बाहेरून’ दिली परीक्षा

निवडून आल्यानंतर आमदार संदीप धुर्वे यांनी मिशीला पीळ देण्याच्या व्यतिरिक्त कुठलेही काम केले नाही. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता मिशी काढून प्रतिज्ञा पूर्ण करावी, असा टोला धानोरकर यांनी लगावला आहे.

चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी सर्वच ठिकाणी विकासकामे केल्याने जनतेने भरभरून मतदान केले. त्यामुळेच मदारसंघात सर्वत्र मोठे मताधिक्य मिळाले व आपला विजय झाला. या विजयात महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, जनता यांचा मोठा वाटा आहे. आता आमदार संदीप धुर्वे यांनी त्यांची प्रतिज्ञा पूर्ण करावी आणि मिशी काढून टाकावी, अशी खोचक टीका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.

हेही वाचा – अमरावती : ८६४ रुपयांच्या कापूस बियाणे पाकिटाची १८०० ला विक्री, कृषी विभागाची कारवाई

धुर्वे यांच्या केळापूर, आर्णी विधानसभा मतदारसंघातही आपल्याला मताधिक्य मिळाले, हीच दिवंगत बाळासाहेब धानोरकर यांच्या कामाची पावती आहे. त्यामुळे आता आमदार धुर्वे यांनी मिशी काढून टाकावी, म्हणजे त्यांना दुसरे काम राहणार नाही, असा सणसणीत टोलाही खासदार धानोरकर यांनी लगावला आहे. धानोरकर यांनी डिवचल्यामुळे आता आर्णी-केळापूरचे भाजप आमदार संदीप धुर्वे मिशी काढणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.