नागपूर : भाजपने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या जाहीरनामासाठी ३१ वेगवेगळ्या मुद्द्यांवर काम सुरू केले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात नागरिकानाही त्यांचे मुद्दे समाविष्ट करता येणार आहे. असे भाजपचे खासदार धनंजय महाडीक यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. आतापर्यंत पक्षाकडे तब्बल ५० हजार सूचना आल्याचाही दावा त्यांनी केला. याप्रसंगी भाजपचे प्रवक्ते चंदन गोस्वामी, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, अश्विनी जिचकार उपस्थित होत्या.

धनंजय महाडिक म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येणार आहे. . जाहीरनाम्यात जनतेच्या अपेक्षा आणि सूचनांचाही विचार होणार असून जनतेने आपल्या सूचना, अपेक्षा आणि मते पक्षापर्यंत पोहचवावी.

हे ही वाचा…पाठिंब्यासाठी ‘निर्भय बनो’च्या मविआला अटी, असीम सरोदे यांनी स्पष्टच सांगितले…

भाजपने महायुती सरकारच्या माध्यमातून नारीशक्तीच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, ३ गॅस सिलेंडर मोफत यासह अनेक योजना यशस्वी केल्या. युवा विकासासाठी कौशल्य विकास, युवतींना मोफत उच्च शिक्षण अशा योजना आणल्या. गरीब कल्याणासाठी मोफत शिक्षण, व्यवसायासाठी अनुदान, आनंदाचा शिधा योजना योजना यशस्वी केली. शेतकऱ्यांसाठीही अनेक योजना आणल्या. उद्योग वाढावेत, परकीय गुंतवणूक राज्यात यावी, यासाठी प्रयत्न होत आहे. महामार्ग, पुलाची उभारणी, मेट्रोचे जाळे, विमानतळांचा विकास, धरणांच्या कामाची पुर्तता, याबाबत काम सुरू आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, शेतकऱ्यांसाठी कृषी सौर योजना, दुधाळ जनावरांसाठी अनुदान आणि लसीकरण, मुक्त गोठा योजनेला प्रोत्साहन, खतांवरील सबसिडी, मत्स्यबीज उपलब्धता, मत्स्य शेतीला प्रोत्साहन अशा अनेक मुद्द्यांवर भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक काम करत आहे.

हे ही वाचा…शिंदेंनी उमेदवारी जाहीर केलेल्या आमदारांच्या विरूद्ध भाजपची मोर्चेबांधणी

इतरही सगळ्याच क्षेत्रात पक्षाकडून विकासाचे काम सुरू आहे. दर्जेदार रस्ते, ग्रीन फिल्ड महामार्ग, विमानतळांची उभारणी, विमान सेवेचा विस्तार, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि इलेक्ट्रीकीकरण, रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण, वंदे भारतसह नव्या रेल्वे गाड्यांची निर्मिती, प्रवाशांना आरामदायी सुविधा, मेट्रो रेल्वेचे विस्तारीकरण, उपनगरीय रेल्वेचे बळकटीकरण, जलमार्गे वाहतुक वाढावी, यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. शहरी विकासासह इतरही सर्वच क्षेत्रात काम सुरू आहे. वरील मुद्यांशिवाय अन्य काही मुद्दयांचा भाजपच्या जाहीरनाम्यात समावेश व्हावा, असे वाटत असेल तर नागरिकांनी आपल्या सूचना, अभिप्राय २५ ऑक्टोंबरपर्यंत द्याव्या असेही महाडिक म्हणाले.