चंद्रपूर :अडीच वर्षाचा एकूणच कारभार बघता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ठाकरे यांचा चेहरा मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळे उध्दव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यातूनच ते वायफळ बडबड करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची जमानत जप्त करण्याची भाषा बोलणारे ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवून आमदार बनून दाखवावे व त्यानंतरच असे आरोप करावे असे थेट आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोन दिवसाच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. रविवारी राजुरा व चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ब्रम्हपुरी व चिमूरच्या दिशेने निघण्यापूर्वी स्थानिक हॉटेल एन. डी. येथे पत्रकार परिषद उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाकरे यांचा विदर्भ दौरा हा वैफल्यग्रस्ततेतून होता.

प्रखर हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव ही एकमेव ओळख असलेल्या उध्दव ठाकरे यांनी काँग्रेसचे हिंदुत्व स्वीकारले आहे. त्यामुळेच शंभर कोटीच्या भ्रष्टाचारच्या आरोपात तुरुंगवास भोगावा लागलेल्या अनिल देशमुख व दीडशे कोटीच्या भ्रष्टाचारच्या आरोपात आमदारकी गमावलेल्यासुनील केदार यांची सोबत त्यांना करावी लागत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जमानत जप्त करण्याची भाषा बोलणाऱ्या ठाकरे यांनी पहिले महाराष्ट्रातून आमदारकी जिंकून दाखवावी व नंतर अशी भाषा बोलावी असेही बावनकुळे म्हणाले. ठाकरे यांनी निवडणूक जिंकली नाही, आमदार म्हणून निवडून आले नाही. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी मागच्या दरवाज्याने आमदारकी मिळवली. याउलट देवेंद्र फडणवीस जननेते आहेत. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे वाघ होते. ते कर्तुत्ववान नेते होते व त्यांचे नेतृत्व प्रखर होते. हिंदू विचार महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात जागवणारे बाळासाहेब ठाकरे याचे सुपुत्र उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्व विचार संपविला आहे. त्यामुळेच त्यांना काँग्रेस सोबत जावे लागले आहे. याउलट बाळासाहेबांनी काँग्रेस सोबत जावे लागले तर राजकीय दुकान बंद करेल असे सांगितले होते. बँक घोटाळ्यात आरोपी असलेले व न्यायालयाच्या शिक्षेमुळे आमदारकी गेलेले काँग्रेस नेते सुनील केदार यांनी छत्रपति शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून महाराजांचा अपमान केला याविषयी नाराजी व्यक्त केली. ठाकरे निराशेतून कटोरा घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे मागे दिल्लीत फिरत आहेत. या दोन्ही पक्षांनी त्यांना लोकसभेत खासदार दिले विधानसभेत तुम्हीच आमदारकी अशी म्हणण्याची वेळ ठाकरे यांच्यावर आली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृह मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपने शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून आणले.

हेही वाचा >>>भंडारा : आमदाराकडून महिला मुख्याधिकाऱ्यांना धमकी, शिविगाळ; ऑडियो क्लिप व्हायरल

विधानसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे यांच्यापेक्षा मोदी – शहा जास्त फिरले. याउलट शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा ठाकरे यांचे नेतृत्व कमजोर होते, त्यांचे नेतृत्व स्वीकारायला त्यांच्या पक्षाचे आमदार तयार नव्हते. त्यामुळे ५० आमदार त्यांना सोडुन निघून गेले ही वस्तुस्थिती आहे.ठाकरे आता कधीच जनतेतून आमदार होणार नाही  , मुख्यमंत्री देखील होणार नाही असेही बावनकुळे म्हणाले. विधानसभा निवडणुकित राज्यातील जनता महायुतीला प्रचंड ताकद देईल. महाविकास आघाडीचे नेते निवडणूक हरण्याची परिस्थिती तयार झाली की मशिनला दोष देतात. आताही तो प्रकार सुरू झाला आहे. महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद करणार असे काँग्रेस नेते सांगत आहेत. राज्यातील बहिणीच काँग्रेसचे दुकान बंद करेल असे ही बावणकुळे म्हणाले. राज्यात व देशात काँग्रेस पक्षाने असंख्य घोटाळे केले. संविधान बदलणार असा खोटा प्रचार लोकसभा निवडणुकीत केला. आता तर काँग्रेस नेते राहुल गांधींच आरक्षणाची गरज नाही असे सांगत आहे. राहुल गांधी यांच्या पोटातील ओठात आले आहे. भाजप कार्यकर्ते राज्यात प्रत्येक घरोघरी जावून राहुल गांधी यांचे आरक्षण बद्दल म्हणणे जावून सांगणार आहे. तसेच महायुती सरकारच्या मोठ्या निर्णयाची माहिती घरोघरी जावून सांगणार आहे अशीही माहिती दिली. भाजप , शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) तिन्ही पक्ष राज्यात एकत्र निवडणूक लढणार आहे. महायुतीचे सरकार आले तर राज्याच्या १४ कोटी जनतेचा विकास करणार आहे.