नागपूर : मानलेला भाऊ आणि त्याच्या पत्नीने बिल्डरकडील २७ लाख रोख आणि ४० तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून पळ काढला. ही खळबळजनक घटना मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गत घडली. या प्रकरणी बिल्डरच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भाऊ आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. शशिकांत जोशी आणि पत्नी शिवानी जोशी अशी आरोपींची नावे आहेत.

प्रकाशनगर, आरती टाऊन परिसरात राहणारे फिर्यादी सागर कारोकार हे बांधकाम व्यवसायी आहेत. या घरात ते एकटेच राहतात. आरोपी शशिकांत जोशी (५२) हा त्यांचा मानलेला भाऊ आहे.

हेही वाचा…‘आरटीई’ घोटाळा : शाहिदचा भाऊ राजाला शरीफला रविवारपर्यंत पोलीस कोठडी

शशिकांतचे मूळ घर तुमसरला आहे. त्याला पत्नी शिवानी जोशी (४०) आणि दोन मुले आहेत. तो वास्तुशांतीचे काम करतो. मात्र, तुमसरला पाहिजे तसे काम मिळत नसल्याने त्याने नागपुरात येण्याची इच्छा व्यक्त केली. यासंदर्भात फिर्यादीशी चर्चा करून तो नागपुरात आला. नागपुरात राहण्याचे ठिकाण नसल्याने फिर्यादीने त्याला पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:च्या घरी ठेवले.

मागील सहा महिन्यांपासून तो फिर्यादीच्या घरच्या सदस्यांप्रमाणेच राहत होता. बिल्डरच्या मदतीने त्याला वास्तुशांतीचे कामही मिळायचे.
फिर्यादीची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची माहिती आरोपींना होती. यासोबतच घरातील रोख रक्कम, दागिने याविषयीसुद्धा त्यांना माहीत होते. दरम्यान २ जून रोजी फिर्यादीच्या आजीचे निधन झाले. अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी ते सकाळी ७.३० वाजताच घराबाहेर पडले. ही संधी साधून आरोपी शशिकांत आणि त्याची पत्नी शिवानी यांनी संगनमत करून फिर्यादीच्या घरी चोरी करण्याची योजना आखली. तत्पूर्वी त्यांनी संपूर्ण सीसीटीव्ही बंद केले.

हेही वाचा…वर्धा :अमर काळे यांच्या विजयाचे पडद्यामागील ‘हे’ आहेत सूत्रधार

कपाटात ठेवलेले चाळीस तोळे दागिने, २७ लाख रोख रक्कम चोरली आणि दोन्ही मुलांसह पळ काढला. फिर्यादी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घरी परतले असता त्यांना घरी कोणीच दिसले नाही. त्यांनी पोलिस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शशिकांत आणि त्याची पत्नी शिवानीविरुद्ध चोरीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा…गोंडवाना विद्यापीठात तब्बल १.४६ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार, चार लिपिकांचा सहभाग

भूखंड विकासक सागर कारोकार यांनी बहिण नसल्यामुळे त्यांनी शिवानी जोशी हिला बहिण मानले होते. तिला सख्ख्या बहिणीप्रमाणे वागणूक मिळत होती. चोरी झाल्यानंतरही त्यांनी प्रकरण घरातच मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शिवानी जोशीला विचारपूस केली. मानलेल्या भावालाही फोन केला. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी घरात पाहिले असता चोरी झाल्याचे समजले.