बुलढाणा: आदिवासी कुटुंबातील आठ सदस्यांना अन्नातून विषबाधा होऊन दोन चिमुकले मृत्युमुखी पडले. उर्वरित सहा जणांवर अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. दरम्यान आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी याला दुजोरा दिला असून दोघा चिमुकल्यांचा शवविच्छेदन (पोस्ट मार्टम) अहवाल प्राप्त झाल्यावरच मृत्यूचे नेमके कारण सांगता येईल असे स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यातील दादुलगाव येथे सध्या या परिवाराचे वास्तव्य आहे. दादुलगाव गावा शेजारी शिवचरण घ्यार यांच्या शेतात बांधमकामात वापरायच्या विटा बनविल्या जातात. या आधुनिक विटभट्टीवर वेगवेगळ्या भागातील नातेवाईक असलेले आदिवासी कुटुंब कामाला आहेत. हे सर्व मजूर आपल्या परिवारासह घ्यार यांच्या शेतातच राहतात. लहान मोठे मिळून जवळपास साठ जण शेतातच वास्तव्याला असल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार मागील २२ सप्टेंबरच्या रात्री उशिरा यातील कमीअधिक आठ जणांना उलट्या, मळमळ, हगवण असा त्रास सुरू झाला. आठ बधितांवर अगोदर दादुलगाव मधील एका खाजगी डॉक्टरने उपचार केले.

हेही वाचा – ओबीसींसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द, शासन निर्णय काय सांगतो?

आरोग्य पथक दाखल

घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला पाटील सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांचेसमवेत जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद जाधव, डॉ. काळे, डॉ. थिगळे, डॉ. रुपाली घोलप यांचाही समावेश होता. या आरोग्य पथकाने बाधित रुग्णांवर उपचार केले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेने सर्व रुग्णांना खामगाव येथील उप जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान दोन चिमुकल्या भावंडाचा मृत्यू ओढावला.

रोशनी सुनील पावरा (वय २ वर्षे ) आणि अर्जुन सुनील पावरा (वय ६ वर्षे) अशी दुर्देवी बहिण- भावाची नावे आहेत. दरम्यान इतर ६ जणांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अकोला येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारसाठी हलविण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून इतर रुग्णांची प्रकृती ‘स्थिर’ असल्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

दरम्यान उपचारादरम्यान दगावलेल्याचे शवविच्छेदन करून चिमुकल्या बहीण भावाचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर दोघा चिमुकल्यावर आसलगाव (तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अकोला येथे उपचार सुरू असलेल्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

हेही वाचा – देहव्यवसायाच्या दलदलीतून बाहेर पडत ती पुन्हा संसारात रमली

दरम्यान घटनास्थळावर गेलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाने विटभट्टी असलेल्या शेताची पाहणी करून इतर सुमारे साठ आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी केली. या आठ जणांशिवाय इतरांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आढळून आले. तसेच पाणी नमुने देखील घेण्यात आले. दादुलगावमध्येही कोणत्याही साथ रोगाचा प्रादुर्भाव नसल्याचे आढळून आले. यामुळे बुरशी आलेले शिळे अन्न खाण्यात आल्याने आठ आदिवासींना बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र रोशनी पावरा आणि अर्जुन पावरा यांचा शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावरच मृत्यूचे नेमके कारण सांगता येईल असे आरोग्य विभाग सूत्रांनी सांगितले. खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथील उप जिल्हा सामान्य रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले आहे. आज किंवा उद्या गुरुवारपर्यंत विच्छेदन अहवाल हाती येणार असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.

जिल्हा पुन्हा हादरला

दरम्यान या दुर्देवी घटना क्रमामुळे आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुका आणि बुलढाणा जिल्हा पुन्हा हादरला आहे. जळगाव तालुक्यातील गोमाल मध्ये तीन आदिवासी बांधवांना काही दिवसांपूर्वीच अतिसारने मृत्यू झाला होता. रस्ते नसल्याने त्यांना झोळीमधून गावात आणण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली होती. आता दोघा चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.