बुलढाणा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज मोताळा तहसील कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या आक्रमक घोषणांनी मोताळा नगरी आणि तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला होता. जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा काढण्यात आला. मोताळा तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आणि पीक नुकसानीची रक्कम, मदत तातडीने देण्यात यावी या मुख्य मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोताळा तहसील कार्यालय जवळ या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. पीक विमा तात्काळ मिळावा, पी.एम. किसान योजनेचे लाभ मिळावे, सिंचनाचे अनुदान प्राप्त व्हावे, महाडीबीटीवर शेतकऱ्यांनी ऑनलाइन केलेले अर्ज निकाली काढून तत्काळ संमती मिळावी. अलीकडेच तालुक्यात चक्रीवादळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळे विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात पडलेले खांब उभे करून रोहित्र सुरू करण्यात यावे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या घरांना प्रलंबित निधी मिळावा, या मागण्याचे निवेदन शासनाला तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले.

हेही वाचा – Ravikant Tupkar Protest : महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीचा मेहकरात ‘आक्रोश’; शेतकऱ्यांना आठ दिवसांत भरपाई द्या अन्यथा…

मोर्चामध्ये संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, महिला आघाडीप्रमुख चंदा बढे, उपजिल्हा प्रमुख सुनील घाटे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, सदानंद माळी, मंगेश बंडे, संदीप पाटील, युवा सेनेचे शुभम घोंगते, ओमप्रकाश बोर्डे, यासह शिवसेना पदाधिकारी, आघाडी प्रमुख, कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले.

विमा कंपन्यांना शासनाचे पाठबळ?

यावेळी जिल्हा प्रमुख बुधवत यांनी सरकार आणि प्रशासनावर टीकास्त्र सोडले. शासनाशी साठगाठ असल्याने पीक विमा कंपन्या आणखी धनाढ्य होत आहे. शासन आणि यंत्रणांचे अभय असल्याने त्यांनी संकटातील शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना कधी मिळणार, असा प्रश्न त्यांनी यावेळी सरकारला विचारला. पीक विमा हा हक्काचा असतानाही त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही. खरीप पीक कर्ज वाटपाची संथगतीसुद्धा शेतकऱ्यांना मारकच ठरली आहे.

हेही वाचा – Nagpur Farmers Protest : दिल्लीत आंदोलनासाठी निघालेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक….नागपुरात थेट रेल्वेसमोर….

सातशे शेतकरी बाधित

मोताळा तहसील अंतर्गत ७०७ शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान पीक विमा योजनेंतर्गत सहा महिने आधी तक्रारी केल्या आहेत. मात्र दीर्घ काळ लोटूनही अजूनही त्यांना लाभ दिला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावर कळस म्हणजे, सिंचनाचे दोन वर्षे लोटल्यानंतरही ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचे अनुदान प्राप्त झालेले नाही. मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे हे प्रश्न बुधवत यांनी तहसीलदार यांच्यासमक्ष मांडले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana provide crop insurance compensation to farmers immediately shivsena aggressive attack on office at tehsil scm 61 ssb