बुलढाणा : बुलढाणा येथून चारधाम यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या लक्झरी ट्रॅव्हल्सने मध्यप्रदेशातील शिवपुरीजवळ अचानक पेट घेतला. गाडीतून धूर निघताना दिसताच चालकाने बस थांबविली. यामुळे ३० प्रवासी सुखरूप बचावले. समृद्धी मार्गावरील भीषण दुर्घटनेची आठवण करून देणारी ही घटना १७ मे रोजी घडली. ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती,’ या म्हणीचा प्रत्यय या घटनेवरून आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा येथील ३० तर धामणगाव बढे ( ता. मोताळा) येथील ३० भाविक दोन ट्रॅव्हल्सद्वारे चारधाम दर्शनासाठी १५ मे रोजी निघाले होते. दरम्यान, कोलारस पोलीस ठाण्याअंतर्गत शिवपुरी ते गुना या चारपदरी ( फोर लेन) महामार्गावर बसने अचानक पेट घेतला. बसमधून धूर निघताना दिसताच चालकाने प्रसंगावधान दाखवून बस थांबवली आणि भाविक प्रवाशांना ट्रॅव्हल्सखाली उतरण्यास सांगितले. प्रवासी उतरताच बसने पेट घेतला. आगीने संपूर्ण बसला आपल्या कवेत घेतले. कोलारस पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझविली. बसचा नुसता सांगडाच उरला आहे.

हेही वाचा…‘रोडकरी’ म्हटल्या जाणाऱ्या नितीन गडकरींच्या विदर्भात ‘हे’ काय घडलं? ‘या’ महामार्गावरील उड्डाणपूलास…

या दुर्घटनेतून बुलढाण्यातील तीस भाविकांचे प्राण वाचले. यात १८ महिला तर १३ पुरुष भाविकांचा समावेश आहे. दरम्यान, या भाविकांना काल रात्री कोलारस येथील मंगल कार्यालयात थांबविण्यात आले होते.

‘त्या’ घटनेच्या कटू आठवणी ताज्या..

या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटनेच्या कटू आठवणी ताज्या झाल्या. ३१ जून २०२३ रोजी नागपूरहून पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या ट्रॅव्हल्सने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा गावातून जाणाऱ्या समुद्धी महामार्गावर पेट घेतला होता. बसला आग लागली आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. बस उलटल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर पडता येत नव्हते. बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. अनेक प्रवासी बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. किंचाळ्या, आक्रोश सुरू होता, पण त्यांना बाहेर पडता येत नव्हते. आगीने रौद्ररूप धारण केल्याने इतरांनाही त्यांना बाहेर काढणे शक्य नव्हते. या भीषण दुर्घटनेत ट्रॅव्हल्समधील २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला होता. यानंतर ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. राज्य सरकारे आणि जिल्हा प्रशासनांनी कारवाईचा धडाका लावला. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यासह महाराष्ट्रात असे अपघात घडतच आहेत.

हेही वाचा…राज्यातील ३२ जिल्ह्यात उष्माघाताचे रुग्ण; ‘हे’ उपाय आवश्यक…

ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचा मनमानी कारभार

या घटनेमुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांवर कुणाचेच निर्बंध नसल्याचे व त्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे पुन्हा दिसून आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडे या दुर्घटनेची कोणतीच माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. मुळात चारधाम काय कोणत्याही टूरवर जाणाऱ्या प्रवाशांची नाव नोंदणी वा माहिती यंत्रणांकडे नसते. यामुळे किमान परराज्यात वा दीर्घ प्रवासावर ट्रॅव्हल्सने जाणाऱ्या प्रवाशांची तपशीलवार यादी आपत्ती, परिवहन विभागाकडे देणे बंधनकारक करणे अपेक्षित व आवश्यक ठरते. जिल्हा प्रशासनाने यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. २५ प्रवाशांचा बळी घेणाऱ्या समृद्धी महामार्गवरील त्या भीषण अपघातातील मृत आणि जखमींची पूर्ण नावे उपलब्ध नसल्याचे तेव्हा निदर्शनास आले होते. कुणाचे फक्त नाव, कुणाचे आडनाव, अशी स्थिती असल्याने बुलढाणा जिल्हा प्रशासन, अन्य यंत्रणा आणि नातेवाईकांचे बेहाल झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana s devotees bus catches fire during chardham yatra in madhya pradesh 30 passengers escape unharmed scm 61 psg