चंद्रपूर : उन्हाळ्याला सुरुवात होताच वाघाच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रतील गंगासागर हेटी कक्ष क्रमांक ९९ मध्ये मारोती बोरकर (६५) यांच्यावर वाघाने हल्ला केला. त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पंचनामा व इतर कारवाई सुरू आहे. दरम्यान मागील काही दिवसात वाघाच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ब्रम्हपुरी तालुक्यात एकाने वाघाच्या हल्ल्यात जीव गमावला. तत्पूर्वी सिंदेवाही तालुक्यात देखील वाघाने एकाचा बळी घेतला होता. उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाघ जंगलातून बाहेर गावात येत आहे. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.