चंद्रपूर : पोलिसांना चकवा देत चंद्रपुरातील हॉटेल सिद्धार्थ प्रिमियर येथून पसार झालेला प्रशांत कोरटकर तेलंगणा राज्यात पळून गेला, अशी माहिती चंद्रपूर पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी कोल्हापूर पोलिसांना दिली. त्यानुसार कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला सोमवारी तेलंगणात अटक केली. कोरटकरच्या अटकेसाठी चंद्रपूर पोलिसांची माहिती महत्त्वाची ठरली, असे पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी गरळ ओकणारा तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कोरटकर गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता. न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिल्यानंतर कोरटकर चंद्रपुरातील हॉटेल सिद्धार्थ प्रिमियर येथे मुक्कामी होता. ११ मार्चला रात्री १०.३० वाजता त्याने हॉटेलामध्ये प्रवेश केला.

ऑनलाईन क्रिकेट सट्टा व्यावसायिक धीरज चौधरी याने त्याची व्यवस्था केली होती. यावेळी कोरटकरसोबत प्रशिक पडवेकर हा देखील होता. दरम्यान, ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित करताच स्थानिक पोलिसांनी या हॉटेलमध्ये जाऊन चौकशी केली आणि कोल्हापूर पोलिसांना माहिती दिली. यावेळी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजसुद्धा ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी बुकी धीरज चाैधरी याची कसून चौकशी केली. याच चौकशीत कोरटकर हा एसयुव्ही महेंद्रा ७०० या गाडीने तेलंगणा येथे पळून गेल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारावर कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी दुपारी कोरटकरला अटक केली.

कोरटकर ज्या मार्गाने गेला त्या मार्गावरील सर्व ‘सीसीटीव्ही फुटेज’ तसेच लक्कडकोट नाक्यावरील आणि हैदराबाद मार्गावरील सर्व पथकर नाके व इतरत्र लावण्यात आलेले ‘सीसीटीव्ही फुटेज’देखील तपासण्यात आले.

‘तो’ पोलीस अधिकारी कोण?

कोरटकरला चंद्रपुरातील हॉटेलमध्ये भेटून गेलेला पोलीस अधीकारी कोण? त्यानेच कोरटकरला तेलंगणात पळून जाण्यास मदत केली का? याबाबत चंद्रपूर पोलीस चौकशी करणार आहेत. सट्टा व्यावसायिक धीरज चौधरी याने चार दिवस कोरटकरचा पाहुणचार केला. मात्र, हाच पाहुणचार कोरटकरला चांगलाच महागात पडला आहे. कारण, चौधरीनेच दिलेल्या माहितीमुळे कोरटकर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

कोरटकरचे घर सरकार तोडणार का?

कोरटकरला अटक होण्यास फार विलंब झाला. हे महाराष्ट्र पोलिसांचे अपयश आहे. कोरटकर हा महाराष्ट्राद्रोही आहे. त्याचे तोंड न लपवता त्याला राज्यात आणा! आता कोरटकरचे घर सरकार तोडणार का?, याचे उत्तर सरकारने द्यावे, असे आवाहन काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.