चंद्रपूर : महावितरणच्या कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधून सरपंचाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्याने याबाबत घुग्घुस पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. सुरज परचाके असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मारहाण करणारा नकोडा येथील सरपंच किरण बंदुरकर हा भाजप पक्षाचा पदाधिकारी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घुग्घुस महावितरणचा कर्मचारी सुरज परचाके यांच्याकडे उसगाव आणि नकोडा या दोन गावाचा प्रभार आहे. नेहमी प्रमाणे महावितरण कर्मचारी परचाके उसगावला निघाले होते. मार्गात नकोडा येथील सरपंच किरण बंदुरकर यांनी त्यांना एसीसी सिमेंट कंपनीजवळ अडवीलं. बंदुरकर म्हणाले की डीपी जवळ काम आहे, नकोड्याला चला. नकोड्याला गेल्यावर त्यांनी मला माझ्याच दुपट्ट्याने विद्युत खांबाला बांधलं. गावाकऱ्यांना गोळा केलं. साधारणत: दोन तास त्यांनी बांधून ठेवलं. घुग्घुस महावितरणचे सहायक अभियंता नयन भटारकर यांना भ्रमणध्वनीने माहिती दिली. भटारकर यांनी घटनास्थळी जाऊन परचाके यांना सोडविले. त्यानंतर त्यांनी सरळ पोलीस स्टेशनला धाव घेतली. मागील काही दिवसांपासून नकोडा येथील विद्युत पुरवठा अनियमितपणे सुरू आहे. त्या रागातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या प्रकारानंतर सरपंच फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा – पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणांना दिलासा; पोलीस आणि सीआरपीएफ भरतीत आता चार दिवसांचे अंतर

दरम्यान, या जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे थोडा वादळ वारा आला तरी वीज पुरवठा खंडित होतो. जिल्ह्यात प्रचंड उष्णतेची लाट आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे प्रचंड गर्मी आहे. गर्मीमुळे लोक प्रचंड संतापले आहे. त्यात वीज पुरवठा खंडित झाला की उकाड्यात बसून गर्मीचा त्रास सहन करावा लागतो. घरात लहान मूल असल्यास त्यांना आणखी चिडचिड होते. तेव्हा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यापेक्षा वीज खंडित होत असल्याने त्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – नितीन राऊत यांचा मुख्यमंत्री शिदेंवर पलटवार, म्हणाले ” सरकार दलितांच्या आंदोलनाला..”

मारहाण करणारा कर्मचारी हा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या अतिशय विश्वासातील आहे. लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा २ लाख ६० हजार इतक्या प्रचंड मतांनी पराभव आल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी अतिशय सहनभुतीपूर्वक लोकांशी तथा शासकीय कर्मचाऱ्यांशी व्यवहार करणे गरजेचे असताना अशा प्रकारे मारहाण करीत असल्याने अशा घटनांतून पुन्हा रोष ओढवून घेतला जात आहे.