नागपूर: या देशांमध्ये राहून काही मुस्लिम पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलत आहे. जे मुस्लिम भारतात प्रेमाने राहतात त्यांच्याबद्दल नितेश राणे बोलले नाहीत  तर भारताबद्दल जे विरोधी मत व्यक्त करतात त्यांच्याबद्दल राणे बोलले, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणे यांची पाठराखण केली.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. नितेश राणे यांनी मुस्लिमांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाची सध्या राज्यभर चर्चा आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांना वादग्रस्त वक्तव्य टाळा, असा सल्ला दिला गुरुवारी दिला होता. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, मुस्लिम समाजातील कुठल्या तरी एका व्यक्तीचा  व्हिडिओ समाज माध्यमावर आला. तो अकोला मधला असून त्यात मोदीचे नाव घेऊन आक्षेपार्ह  वक्तव्य करण्यात आले होते. त्यावरुन नितेश राणे यांनी मुस्लिम समुदायावर टीका केली. त्या व्हिडीयोची चौकशी केली जात आहे. अनिल बोंडे यांनी केलेल्या वक्तव्याचा समर्थन करत नाही.पण राहुल गांधी यांचे वक्तव्य ओबीसी आणि अनुसूचित जाती जमातीत असंतोष निर्माण करणारे आहे. महायुतीच्या नेत्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करुन नये, अशा सूचना देण्यात आल्या आहे. काँग्रेस बद्दल बोलले तर हरकत नाही, मात्र कुणावरही वैयक्तिक टीका  करू नये ,असा सल्ला त्यांनी  दिला.

हेही वाचा >>>कामठी रेल्वे स्थानकाबाहेर हावडा एक्सप्रेसवर दगडफेक

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. काँग्रेस आणि शरद पवार त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाहीत.उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होऊ शकत नाही. शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे  आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जेवढा उद्धव ठाकरे यांचा वापर करायचा तर तेवढा त्यांनी केला आहे.  मात्र आता महाविकास आघाडीतील दोन्ही पक्ष उद्धव ठाकरे यांना चर्चेच्यावेळी विश्वासात घेत नाही आणि त्यांना कधीही मुख्यमंत्री करणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला दिल्लीत भेटून आले. शरद पवार, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेना यांना ते भेटले. पण त्यांनी कोणीही त्यांना गंभीरपणे घेतले नाही. महाविकास आघाडीचे मेळावे बंद झाले. मेळावे घेतले तर मुख्यमंत्री कोण हे जाहीर करावे लागेल. त्यामुळे आता त्या भीतीने मेळावे बंद झाले अशी टीका त्यांनी केली.

अमित शहा विदर्भात

२४ सप्टेंबरला गृहमंत्री अमित शहा विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. त्याच दिवशी दुपारी संभाजीनगरला पक्षाची बैठक आहे. २५ सप्टेंबरला नाशिकला आणि एक बैठक पश्चिम महाराष्ट्राची सोलापूरला प्रस्तावित आहे. २४ आणि २५ सप्टेंबरला महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांशी संवाद असा त्यांचा दौरा असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.