नागपूर : शहरातील भडकलेल्या दंगलीबाबत गुप्तचर यंत्रणांचे अपयश असे म्हणता येणार नाही, पण अधिक चांगले इनपुट्स गुप्तचर यंत्रणा देऊ शकली असती. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे माहिती ठेवण्यात कमी पडली, अशी कबुली राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते पोलीस आयुक्तालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाल-गांधीगेटसमोर औरंगेजबची प्रतिकात्मक कबर जाळली. कबरीवरील हिरव्या रंगाच्या चादरीवर आयत लिहिलेल्या होत्या, अशी संभ्रम निर्माण करणारी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मुद्दामून पसरविण्यात आले. त्यामुळे सोमवारी दंगल घडली. ही दंगल घडण्यामागे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे का? असा प्रश्न विचारताच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दिवसभर सुरु असलेल्या या दंगलीबाबत पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला बरीच माहिती होती. त्यामुळे गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हणता येणार नाही. मात्र, गुप्तचर यंत्रणा अधिक चांगली माहिती गोळा करु शकली नाही. गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर असती तर कदाचित वेगळे चित्र असते, अशी कबुली फडणवीस यांनी दिली.

फडणवीस पुढे म्हणाले, की पोलिसांनी काढलेल्या व्हिडिओमध्ये आणि प्रसारमाध्यमांवरील व्हिडिओमध्ये अनेक चेहरे समोर आले आहे. प्रत्येक दंगेखोराला शोधण्याचे काम पोलीस करीत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत १०४ जणांची ओळख पटवली असून ९२ जणांना अटक केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही दंगलखोरांनी खोटी माहिती पसरवून दंगल भडकविण्याचा प्रयत्न केला आहे. ६८ जणांची ओळख पटवली असून त्यांच्यावर गुन्हे दाख करण्यात आले आहे. संचारबंदीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आता टप्प्याटप्प्याने संचारबंदी शिथील करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी आयुक्तालयात बैठक घेतली आहे. शेवटच्या दंगेखोरावर गुन्हे दाखल करुन कारवाई करा. प्रत्येकाला चागंला धडा शिकवा. यांना आता सरळ केले नाही तर भविष्यात त्यांची हिम्मत वाढेल. दंगेखोरांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. त्यात ३ पोलीस उपायुक्तांसह ३५ कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे हल्लेखोरांना अजिबात सोडू नका, असे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत.