बुलढाणा : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ चिखली शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. या निर्घृण घटनेच्या निषेधार्थ चिखलीतील सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक एकवटल्याचे दिसून आले.
आज मंगळवारी, अकरा मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या बंदलालहान मोठे व्यापारी, सामाजिक संघटना उत्स्फूर्त पाठबळ दिल्याने कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे दिसून आले. मुख्य मार्गावरीलच नव्हे तर अंतर्गत मार्गावरील आणि परिसरातील दुकानें बंद होती.शांततेत आणि एकजुटीने नागरिकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठा, औद्योगिक प्रतिष्ठाने, आणि वाहतूक संपूर्णतः बंद होती. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिला. बंद शांततेत पार पडला.पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
या आंदोलनाच्या माध्यमातून चिखलीतील नागरिकांनी शासनाकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. स्व. संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहत आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांनी आपली एकजूट दाखविली आज सकाळी चिखली बसस्थानक परिसरात मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते एकत्र आले. या वेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी चिखली तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात विविध मागण्याचा समावेश आहे.
काय आहे मागण्या?
स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात याव्यात, या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,बीड जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र आयपीएस दर्जाचा पोलीस अधिकारी नेमण्यात यावा आदि मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.