लोकसत्ता टीम

नागपूर : नीट परीक्षेतील घोळ, नेटचा पेपर फुट प्रकरण तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी, गोरगरीब विरोधी धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आयोजित चिखलफेक आंदोलनादरम्यान पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीत कार्यकर्त्यांचे कपडे फाटले.

यावरून काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी पोलीस प्रशासन पक्षपाती झाले असून सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप केला. काँग्रेसने आज राज्यव्यापी चिखलफेक आंदोलन केले. नागपुरातील व्हॅरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार विकास ठाकरे, प्रशांत धवड, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष ॲड. नंदा पराते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. नागपूर शहर जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेद्र मुळक उपस्थित होते.

आणखी वाचा-साहेब, पक्षातील मक्तेदारी थांबवा, अन्यथा भाजपविरोधात… देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्याचे पत्र..!

महाभ्रष्ट,शेतकरी विरोधी भाजप सरकार विरोधात चिखल फेको आंदोलन आयोजित केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या विचाराने चालणा-या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम महाभ्रष्ठ युती सरकारने केले आहे. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली आणि आरक्षणाचे वाद निर्माण करु जाती जातीत भांडणे लावून राज्यातील सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मागील १०वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. राज्यातील मोठे उद्योग गुजरातला पाठवले आहे. सरकाररी नोकर भरती केली जात नाही.

स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत,हया परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागते. निट परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्याथ्र्याचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे. राज्यातील पोलीस भरती चिखलात सुरु आहे. यामुळे उमेदवारांचे नुकसान होत आहे. सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत सरकार चालढकल करत असल्याने बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. गुन्हेगारी मध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. महिला, मुलींचे दिवसाढवळया रस्त्यावर खून पाडले जात आहेत. राज्यातील शेतकरी भयंकर संकटात आहेत पण त्यांना मदत दिली जात नाही. कांदा,कापूस सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही, सरकार एमएसपी देत नाही.

आणखी वाचा-वर्धा : सहा पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या काय आहे कारण…

कठीण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे. राज्यात खते,बि-बियांणाचा काळाबाजार असून कर्जासाठी शेतक-यांची अडवणूक होत आहे. सरकारच्या आर्शिवादाने श्रीमंताची मुले गोरगरीब लोकांना गाडया खाली चिरडत आहेत, असे विकास ठाकरे म्हणाले.