वर्धा : शासन घरपोच सेवा देत असेल तर फारच उत्तम. वर्धा जिल्ह्यातील नागरिक म्हणून आनंद होत आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सेवादूत हा उपक्रम सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या संकेतस्थळावर कामाची नोंदणी केली की शासकीय कर्मचारी तुमच्या घरी येवून विचारतो की सांगा काय करायचे. विविध सतरा प्रकारच्या सेवा या मार्फत देणे सुरू झाले आहे.
हेही वाचा – आज मध्यरात्री आकाशात उल्का वर्षाचा प्रकाश उत्सव, खगोलप्रेमींसाठी पर्वणी
सुरवात वर्धा शहर, नंतर सर्व नगर पालिका व आता सर्व तालुका पातळीवर हा उपक्रम अमलात येत आहे. राज्यात हा असा पहिलाच उपक्रम म्हणून त्याचं सादरीकरण मुंबईत झाले. यावेळी मुख्य राज्य लोकसेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव तसेच याच विभागाचे कोंकण आयुक्त बलदेव सिंह व पुण्याचे दिलीप शिंदे उपस्थित होते. त्यांना जिल्हाधिकारी कर्डिले यांनी उपक्रम समजावून सांगितला. तेव्हा उद्गार निघाले, अरे वाह. ही प्रणाली राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याची प्रशंसा त्यांनी केली आहे. जिल्हा माहिती कार्यालय तर्फे यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.