नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. स्वराज्याचे स्वप्न त्यांनी साकारले, ते पहिले स्वातंत्र्य सेनानी आहेत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या जनतेच्या पाठीशी उभे राहिले , शेतकऱ्यांचे राजे होते, त्यांनी सर्वच घटकाला न्याय दिला, त्यांच्याकडून आम्हा सगळ्यांनाच लढण्याचे बळ मिळते असे वडेट्टीवार म्हणाले.
राज्यात महायुती मध्ये सारखी घुसफूस दिसत आहे. तीन तोंडी सरकारची तिन्ही तोंडे तीन दिशेला आहेत. कोणत्याही निर्णयात सरकार मध्ये एकवाक्यता नाही. महायुती सरकारचे अधपतन असेच होणार आहे. जनतेचे प्रश्न सोडवणेपेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्यात या सरकार मधील मंत्र्यांना रस आहे, त्यामुळे जनता यांना धडा शिकवेल अशी टीका काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला, याचा निषेध आम्ही करतच आहोत पण अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. फक्त छत्रपतींचे नाव घेऊन उपयोग नाही, त्यांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत सरकारने दाखवावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
संतोष देशमुख प्रकरणात आधी टीका करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री मुंडे यांची भेट घेतली. काहीतरी साध्य करण्यासाठीच धस आणि मुंडे भेट झाली असणार, म्हणूनच आक्षेप घेण्यात येत आहे. संतोष देशमुख प्रकरणात कुटुंबियांना न्याय मिळणे आवश्यक आहे. पण या भेटीने कुछ तो गडबड है अशीच भावना निर्माण झाली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. छोटेसे ऑपरेशन झाले असताना धस मुंडे यांना का भेटले? आणि आता धस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर आक्षेप घेत असतील तर इतके बळ त्यांना कोण देत आहे असा खोचक टोला विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी लगावला.