नागपूर : नागपुरमध्ये सोमवारी रात्री हिंसक घटना घडल्याने महाराष्ट्राच्या लौकिकाला काळीमा फासला गेला आहे. दगडफेक आणि जाळपोळीची घटना अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा काही शक्ती प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील शांतता व सामाजिक सौहार्द टिकवणे गरजेचे आहे. नागपूर शहरात झालेल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करून स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणीसाठी एक समिती स्थापन केली आहे.
काँग्रेसची ही समिती दंगलग्रस्त भागात जाऊन परिस्थितीची पाहणी करीत आहे व शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या समितीत माजी प्रांताध्यक्ष गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर, आमदार साजिद पठाण हे या समितीचे सदस्य असून नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे निमंत्रक तर अखिल भारतीय काँग्रेसचेचे सचिव प्रफुल्ल गुडधे हे समन्वय आहेत.
ही समिती शनिवारी नागपुरात दाखल झाली. परंतु नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी समितीच्या सदस्यांना दंगलग्रस्त भागात जाण्या मनाई केली आहे. त्यासंदर्भातील पत्र शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांना पोलिसांनी दिले. काँग्रेस नेते दंगलग्रस्त भागात गेल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दंगलग्रस्त भागाची पाहणी करू देण्याची विनंती करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने नागपुरातील महाल, गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सोमवारी आंदोलन केले. यावेळी औरंगजेबचा प्रतिकात्मक पुतळा आणि चादर जाळण्यात आली. त्यानंतर मध्य नागपुरात दोन गटात तणाव निर्माण झाला आणि त्याचे रुपांतर दंगलीत झाले.
पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंगलग्रस्त भागात संचारबंदी सोमवारी रात्रीपासून जाहीर केली आहे. महाल, इतवारी, गांधीबाग, लकडगंज, कोतवाली या परिसरातील बाजारपेठा कडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकॅडिंग केली आहे. गांधी गेट, महाल चिटणीस पार्क चौक यासह अन्य भागात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे जवानाना तैनात केले आहे. शहरातील मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील या काही निवडक लोकवस्त्या वगळता नागपूर शहरात इतरत्र सामान्य जीवन आहे.