नागपूर : महाराष्ट्रात निवडणुकीचे बिगूल वाजले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर, खर्च आणि भष्ट्राचारावर लक्ष केंद्रित केले आहे. लाडकी बहिण योजनेतील तर दररोज नवनवीन किस्से समोर येत आहेत.

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लाडकी बहिण योजनेची जाहिरात, त्याचे विविध कार्यक्रम यावर सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीवरून सरकारला धारेवर धरले आहे.

हेही वाचा >>> राज्य शासनाला सुप्रीम झटका, रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र वैधच…

ते म्हणाले, भाजपा सरकारने प्रचंड महागाई करुन ठेवली आहे, ७० रुपयाचे तेल १२० रुपये केले, साखर, गुळ, डाळी, रवा अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगणाला भिडल्या आहेत. नोकऱ्या नाहीत त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांना मदत नाही अशा परिस्थितीत ‘लाडकी बहिण’ योजनेची जाहिरातबाजी करून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना काय दाखवायचे आहे? यांनी घरातून पैसे दिले, की आपली मालमत्ता विकून पैसे दिले? ते जनतेचे पैसे आहेत.

हेही वाचा >>> राज्यात डेंग्यूग्रस्तांच्या तुलनेत मृत्यू अधिक; कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण? जाणून घ्या…

काँग्रेस सरकारने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली, बसमधून मोफत प्रवासाची योजना लागू केली, शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले, त्यासाठी काँग्रेस सरकारने ‘इव्हेंट वा जाहिरातबाजी’ केली नाही, परंतु ‘टेंडर घ्या व कमिशन’ द्या या भाजपा महायुती सरकारच्या धोरणानुसार ‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीवर भाजपा युती सरकारने २०० कोटींची उधळपट्टी केली आहे. जनतेच्या कष्टाचा पैसा अशा पद्धतीने ‘इव्हेंट, जाहिरातीबाजी’ आणि चमकोगिरीवर उधळून लूट सुरु आहे, असा टीका अतुल लोंढे यांनी निवेदनाव्दारे केली. तसेच जनतेच्या कराच्या पैशांची अशा पद्धतीने उधळपट्टी केली जात असल्याने सामान्य माणसाला चीड आल्याशिवाय राहणार नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले.

आरक्षण आंदोलनामुळे मतांवर होणारा संभाव्य परिणाम कमी करण्याबाबत भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात सूचना दिल्या. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे तीन हजार मेळावे घेण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका क्षेत्रांत लाभार्थ्यांचे सत्कार करण्यासाठी शासकीय कार्यक्रम घेण्यात आले. लोकसभा निवडणुकीतील नकारात्मकता घालविणारी योजना म्हणून सत्ताधाऱ्यांनी महिला मतपेढीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय दसऱ्यापासून दिवाळीच्या धनत्रयोदशीपर्यंत मोटार सायकल रॅली, लाभार्थींच्या गाठीभेटी असे अनेक कार्यक्रम भाजप कार्यकर्त्यांना नेते अमित शहा यांनी दिले. आरक्षण आंदोलनांमुळे मतांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी महिला मतपेढीतून ही कसर भरून काढण्याची रणनीती भाजपने आखली आहे.