भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पूर्व विदर्भावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून आज ते भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे आले होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत केलेली चूक विधानसभा निवडणुकीत करू नका, असे आवाहन केले.

संविधान कोणीही बदलू शकत नाही

यावेळी अजित पवारांनी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना, कृषीपंप वीज माफी, यासारख्या योजनांची माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीने संविधान बदलणार असल्याचे सांगून तुमची दिशाभूल केली. मात्र, संविधान कोणी बदलू शकत नाही, हे लक्षात ठेवा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास तुमच्या जीवनात काही एक फरक पडणार नाही. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा जेवढा विकास आम्ही केला ती करण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही. शेतकऱ्यांचे काही प्रश्न केंद्राकडून सोडवून आणावे लागतात. विकासासाठी निधी खेचून आणावा लागतो. महाविकास आघाडीला निवडून दिल्यास त्यांचे उत्तर ठरलेले राहणार, असे अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा >>> बुलढाणा: चौथ्या दिवशी सापडला एकाचा मृतदेह; दोघे बापलेक मात्र बेपत्ताच

विरोधक दिशाभूल करतील

केंद्रात आपले सरकार नाही, आमचे तिथे कोणी ऐकतच नाही, अशी उत्तरे देऊन ते बोळवण करतील. संविधान बदलणार, अशी भीती दाखवून लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी तुमची मते घेतली आणि तुमची दिशाभूल केली. आताही केंद्रात मोदी यांचेच सरकार आहे. संविधानाला कोणी हात लावलेला नाही. आम्ही जय हिंद आणि जय भीम म्हणणारे आहोत. त्यामुळे कोणी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोणालाही एकटे सोडणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महिलांचे कौतुक केले. पवार म्हणाले, पिंक रंगातील फेटे घातलेल्या माझ्या माय माऊली छान दिसतात. अशाच घरी जा नवऱ्याच्या पुढे उभ्या रहा आणि विचारा कशी दिसते. गमतीचा भाग जाऊ द्या. लाडकी बहीण योजना सर्वांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगताच महिलांनी त्यांना दाद दिली.

हेही वाचा >>> “लाडकी बहीण नव्हे, लाडकी खुर्ची योजना, तीनही भाऊ लबाड”, ठाकरे गटाच्या नेत्याने थेटच….

राजू कारेमोरेंना उमेदवारी!

तुमसरने नेहमी राष्ट्रवादीला साथ दिली. विधानसभा निवडणुकीत राजू कारमोरे यांना जास्त मतांनी निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राजू कारेमोरेंना उमेदवारी मिळणार, अशी चर्चा रंगली आहे. तीन वर्षांत तुमसरसाठी तीन हजार कोटी दिले. आता घड्याळचे बटन दाबा, पुढच्या वेळेस पाच वर्षांत पाच हजार कोटी रुपये मी तुमसरसाठी देणार, असे आश्वासनही अजित पवारांनी दिले. कदाचित पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.