नागपूर : वाहनाची उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्यासाठी परिवहन विभागाने अंतिम मुदतीत पून्हा मुदतवाढ दिली आहे. आता ३० जून २०२५ ही अंतिम तारीख असणार आहे.केंद्र सरकारच्या नियमानुसार राज्य शासनाने एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित केलेल्या वाहनांना मार्च २०२५ पर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याच्या सूचना परिवहन विभागाने केल्या होत्या. मात्र, संकेतस्थळावर तांत्रिक बाबींमुळे वाहनधारकांना अडचणी येत होत्या.
त्यामुळे पाटी (एचएसआरपी) बसवण्यात विलंब होत होता. वाहनधारकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, अंतिम मुदतीत एक महिन्याची वाढ केल्यावर ३० एप्रिल २०२५ पर्यंत पाटी बसवण्यास परवानगी दिली गेली होती. आता शासनाने पून्हा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता ३० जून २०२५ पर्यंत राज्यातील वाहन धारकांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटील लावता येईल.
प्रकरण काय?
सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, वाहनधारकांनी याला फारसा प्रतिसाद दिला नाही. तसेच, अनेकांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अजूनही अडचणी येत आहेत. त्यामुळे आताही लक्षावधी वाहनधारकांनी अद्याप अनिवार्य पाट्या बसवल्या नसल्यामुळे परिवहन विभागाने पून्हा मुदतवाढ दिली आहे. अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय वाहनधारकांना फायदेशीर ठरेल. १ एप्रिल २०१९ नंतर खरेदी केलेल्या वाहनांवर उत्पादकामार्फत एचएसआरपी पाटी बसविण्यात आल्यामुळे अशा वाहनधारकांना पुन्हा ती बसवण्याची आवश्यकता नाही.