वर्धा : तेली समाज हा माझाच समाज आहे. तो सदा माझा पाठीराखा म्हणून मी पण तेली समाजाचा पाठीराखा. ते जेव्हडी मला मदत करतील, त्यापेक्षा डबल मी त्यांना मदत करणार. कोणत्याही पक्षापेक्षा ज्यास्तीत ज्यास्त तेली समाजाच्या बांधवांना भाजप उमेदवारी देण्याचा प्रयत्न करणार, ही भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. ३ ऑक्टोबर रोजी प्रांतिक तैलिक महासंघाचे शिष्टमंडळ फडणवीस यांना भेटले होते. त्यावेळी फडणवीस यांचे हे बोल समाजाच्या नेत्यांनी प्रसिद्धीमाध्यमास कळविले होते.

आता आज जाहिर झालेल्या पहिल्या यादीत तेली समाजास भाजपने किती प्रतिनिधित्व दिले याचा पडताळणी झाली. त्यात देवळी येथून राजेश बकाने, नागपुरात कृष्णा खोपडे व स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे तीन उमेदवार तेली समाजाचे आहेत. हा वाटा पुरेसा नसल्याची भावना असल्याचे बोलल्या जात आहे. प्रांतिक तैलिक महासंघाचे अध्यक्ष असलेले माजी खासदार रामदास तडस हे म्हणाले की पुरेसा नाही असे म्हणता येणार नाही. कारण युतीच्या राजकारणात काही गोष्टी सांभाळाव्या लागतात. पण भाजपच्या पुढील यादीत आणखी तीन उमेदवार समाजाचे राहू शकतात. विदर्भाबाहेर पण उमेदवारी मिळू शकते, असा विश्वास तडस यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा…‘एसटी’च्या भाडेवाढ रद्दमुळे १०० कोटींचा फटका, अन् कर्मचाऱ्यांची दिवाळी भेट…

३ ऑक्टोबरला फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीत विविध मागण्या निकाली निघाल्याने तेली समाज संघटनेने आनंद व्यक्त केला होता. १०० कोटी रुपयाची तरतूद असलेले श्री. संत संताजी जगनाडे महाराज तेली घाणा स्वायत्त आर्थिक विकास महामंडळ, नवी मुंबई येथे भूखंड, जगनाडे महाराज यांच्या पूणे जिल्ह्यातील समाधीस्थळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरघोस निधी तसेच अन्य मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. तसेच केंद्र व राज्य शासन तेली समाजाच्या पाठीशी खंबीर उभे असल्याची ग्वाही मिळाली होती. या तत्पर प्रतिसादबद्दल तेली समाज संघटनेने आनंद व्यक्त केला होता. आज भाजपच्या पहिल्या यादीत तीन उमेदवार देण्यात आले असून भाजपकडून न्याय मिळणार अशी खात्री व्यक्त केल्या जात आहे.
विदर्भात मोठ्या संख्येने असलेल्या तेली समाजाकडे काँग्रेसने दुर्लक्ष केल्याची भावना या समाजात पसरली होती. त्याची चाहूल लागलेल्या भाजपने २०१४ पासून या समाजास मोठे प्रतिनिधित्व देणे सूरू केली. त्याचा फायदा भाजपला झाल्याचे म्हटल्या जाते. तर काँग्रेस पक्षास फटका बसल्याची चर्चा सूरू झाली. समाज नेते रामदास तडस हे खासदार झाल्यावर त्यांनी भाजपच्या व्यासपीठावर समाजाचा आवाज बुलंद केला. ते आता पडल्याने या समाजाचे राजेश बकाने यांच्यासाठी विधानसभा मतदारसंघ खेचून भाजपने न्याय दिला असेही म्हटल्या जाते.