अकोला: कृषी क्षेत्रात प्रगतीसोबतच आव्हाने वाढली आहेत. अनियमित पावसामुळे नैसर्गिक संकट ओढवते. वातावरणातील बदलाचे परिणाम समजून घेत संशोधन करण्याची खरी गरज आहे. त्यामध्ये कृषी विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका असून त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. जलवायू परिवर्तनानुसार वाण विकसित केले पाहिजे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कृषी विद्यापीठात आयोजित ॲग्रोटेक कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्ष संध्या अढाऊ, आ. रणधीर सावरकर, आ. वसंत खंडेलवाल, आ.हरीश पिंपळे, आ.प्रकाश भारसाकळे, आ. अमोल मिटकरी, आ.विप्लव बाजोरिया, कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हाधिकारी अजित कुंभार, माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पावसाने होणार नववर्षाचे स्वागत! वाचा, कुठे कुठे पडतील सरी…

पुढे बोलतांना ते म्हणाले, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी भारतात कृषिक्रांतीची सुरुवात केली. त्यांनी कृषिमंत्री असतांना राबवलेल्या प्रकल्पामुळे कृषी क्षेत्रात परिवर्तन घडले. भाऊसाहेबांनी विविध प्रकारचे प्रयोग केल्याने भारत अन्न-धान्यांत स्वयंपूर्ण झाला. विदर्भात शिक्षणाच्या क्षेत्रात भाऊसाहेबांनी मोठे कार्य केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शिक्षणाचा प्रचार-प्रसार झाला. शेतकरी सुशिक्षित होऊन त्यांना पारंपरिकसह कृषी क्षेत्रातील विज्ञानाची देखील जाण असावी. तरच शेतकरी समृद्ध होऊ शकेल, ही भाऊसाहेबांची भूमिका होती.

विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे शेतीची तुकडे पडत आहेत. शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता कमी झाली. अनियमित पावसामुळे नैसर्गिक संकट ओढवते. शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न उभे झाले आहेत. वातावरणातील बदलाचे परिणाम समजून घेत वाण विकसित करण्याची गरज आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अनेक चांगले प्रयोग केल्याने उत्पादन वाढत आहे. शेतीतील गुंतवणूक वाढवली, तर शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवता येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >>>Intelligence Bureau Bharti: ‘आयबी’मध्ये तब्बल इतक्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू, नोकरीची सुवर्णसंधी…

विविध योजनांचा लाभ अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने तरतूद केली जाते. प्रत्येक गावातील सहकारी संस्थांचे कृषी व्यवसायामध्ये परिवर्तीत करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रत्येक गावात सुविधा निर्माण होईल. शेतीसाठी १७ हजार मेगावॉट वीज द्यावी लागते. ती सर्व वीज येत्या तीन वर्षांत सौर ऊर्जाच्या माध्यमातून तयार केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळेल. आठ हजार कोटी रुपये विविध माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जात आहेत. विदर्भ-मराठवाडा दूध प्रकल्प सुरू केला आहे. शेतकऱ्यांना दुधाचा जोडव्यवसाय देता आला पाहिजे, यासाठी निर्णय घेण्यात आला, असे फडणवीसांनी नमूद केले.

शेतकरी आत्मनिर्भर होत नाही, तोपर्यंत प्रयत्न करावे लागतील. शासन पाठीशी उभा राहील. त्यामध्ये सर्वात मोठी भूमिका कृषी विद्यापीठांची राहणार आहे. नैसर्गिक शेती अभियान सुरू करण्यात आले आहे. उत्पादकता वाढण्यासाठी नैसर्गिक शेतीकडे वळावे लागेल. पुढील टप्प्यात विषमुक्त शेती केली जाईल, असे फडणवीसांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister fadnavis opined that challenges have increased along with progress in agriculture sector ppd 88 amy
Show comments