नागपूर : तब्बल सात अर्थ संकल्पात घोषणा होऊनही विदर्भातील संत्रा पट्टा अशी ओळख असलेल्या वरुड-मोर्शी पट्ट्यात सरकारकडून एकही संत्री प्रकल्प उभारण्यात आला नाही, शासनाकडून केलेल्या घोषणा फोल ठरल्या आहेत.अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.शासनाने १९५७, १९६३, १९९२, १९९५, २०१४, २०१७, २०१९, २०२१ च्या अर्थसंकल्पात विदर्भात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात एकही प्रकल्प उभा राहिला नाही. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा शासनाच्या घोषणांवर आता विश्वास राहिला नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मोर्शी तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केली.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरूड तालुका हा संत्रा विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जात असून आशीया खंडातील सर्वात जास्त पिकविला जाणाऱ्या मोर्शी वरूड तालुक्यातील नागपुरी संत्राने वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोर्शी वरूड तालुक्यात ४७ हजार हेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात आंबिया व मृग बहाराच्या संत्र्याचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. परंतु मोर्शी वरूड तालुक्यात कुठेच संत्रावर प्रक्रिया करणारा प्रकल्प नाही, कोल्डस्टोरेज व वेअर हाऊस सुविधा नाही, तसेच संत्रा व मोसंबीवर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची वाणवा असल्याने शसानाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना त्यांचा संत्रा कवडीमोल भावात विकावा लागत असल्याचा आरोप संत्री उत्पादकांनी केला आहे.

काही वर्षांपूर्वी वरूड तालुक्यात संत्रा परिषदेच्या उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरूड येथे ऑरेंज डीहायड्रेशन प्रकल्प उभारणीची घोषणा केली होती. नंतर महाविकास आघाडी सरकारने देखील वरूड- मोर्शीसाठी संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्याची घोषणा केली मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सन २०२१ मध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोर्शी वरूड तालुक्यात अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प साकारणार असल्याची घोषणा केली. मात्र त्यावर ३ वर्षाचा कालावधी लोटून गेला. अजित पवार यांनी २०२४ चा अर्थसंकल्प सादर केला त्यामध्येही संत्रा प्रकल्पासाठी आर्थिक तरतुद करण्यात आली नाही. २०२५ च्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करून अत्याधुनिक संत्रा प्रकल्पाची घोषणा करावी अशी मागणी आहे. मोर्शीमध्ये संत्रा रस प्रक्रिया केंद्र सुरू करून त्याचे देशात विपणन करण्यासाठी ब्रँड निर्माण केला जाईल, असे ठोस आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. ते आश्वासन हवेतच विरले.,असा दावाही त्यांनी केला

Story img Loader