वर्धा : महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश नं मिळाल्याची जोरात चर्चा झाली. याचे शल्य नेत्यांना आहेच. पण ब्लेम गेम सूरू झाल्याने पराभवाचे वाटेकरी कोण, हा प्रश्न अग्रभागी आला आहे. राज्यातील भाजप आमदारांची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. आता १४ जूनला परत खास बैठक बोलाविण्यात आली आहे. यात आता आमदार राहणार नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपच्या मुंबई कार्यालयात होणाऱ्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संबोधणार आहे. या बैठकीस प्रदेश पदाधिकारी, लोकसभा निवडणूक लढलेले उमेदवार, नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य, विभाग संघटन मंत्री, जिल्हाध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष, प्रकोष्ठ संयोजक निमंत्रित आहेत. उपस्थिती पूर्णवेळ अपेक्षित असल्याचे सूचित करण्यात आले आहे. पक्षाचे वर्ध्याचे पराभूत उमेदवार रामदास तडस हे या बैठकीस उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. पराभवाचे विश्लेषण करणारा अहवाल सादर केल्या जाईल. पराभूत झालेल्या लोकसभा मतदारसंघात नेमके काय घडले, हे सांगण्याची संधी पराभूत उमेदवारांना मिळणार की नाही, याचा खुलासा झालेला नाही. पण काही ठिकाणी उमेदवार व पक्ष संघटना यांच्यात समन्वय नसल्याचे बोलल्या जाते. वर्धा मतदारसंघात तसे आरोप आता होवू लागले आहेत. तर काहींनी शेतकऱ्यांची नाराजी भोवल्याचा सूर काढला.

हेही वाचा – विदर्भात मोसमी पाऊस आणखी दोन पाऊल पुढे; चंद्रपूर, अमरावती येथे आगमन

वर्धा व अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळेगाव येथे सभा घेतली होती. ती चांगलीच यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला होता. यशस्वी झाली तर मग अमरावती व वर्धा मतदारसंघात विजय मिळण्यास त्याचा उपयोग करुन घेण्यात पक्षनेते कुठे कमी पडले, असेही विचारल्या जात आहे. उमेदवारावर खापर फोडून चालणार नाही. कमळ हेच उमेदवार असे समजून कामाला लागण्याची तंबी देण्यात आली होती. मग इतर नेते कुठे कमी पडले, याची झाडाझडती घेतल्या जाणार असल्याचे म्हटल्या जात आहे.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळला; नागपुरात स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधात विदर्भवादी आक्रमक

फडणवीस व बावनकुळे हे सातत्याने मतदारसंघातील नेत्यांकडून माहिती घेत होते. मग उमेदवार व अन्य नेत्यांनी उणिवा त्याचवेळी का लक्षात आणून दिल्या नाहीत, असेही विचारल्या जाण्याची शक्यता सांगण्यात आली. वर्धा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ मोर्शी याच क्षेत्रात भाजपला मताधिक्य मिळाले. देवळीत उमेदवार खूपच माघारला. ईथे पक्षाचा आमदार नसल्याने संघटनेवर विशेष जबाबदारी होती. तसेच तडस यांचा हा गड समजल्या जातो. तडस व संघटना नेते कुठे कमी पडले, याचीही मिमांसा होईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis and chandrasekhar bawankule meeting in mumbai invitation to defeated candidates pmd 64 ssb
Show comments