नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजना जाहीर केल्या. लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यात मिळू लागला आहे. ही योजना म्हणजे सरकारी पैशाची उधळपट्टी आहे, केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून महिलांची मते घेण्यासाठी योजना आहे, अशी टीकाही या योजनेवर होत आहे. याच अनुषंगाने एक याचिका नागपूर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते हे काँग्रेस कार्यकर्ते असल्याचा आरोप भाजपने केला आहे. शनिवारी झालेल्या महायुतीच्या महिला मेळाव्यातही भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा पुनरुच्चार केला.

याचिकाकर्ते यांचे नाव अनिल वडपल्लीवार आहे. अनेक सामाजिक प्रश्नांवर विशेषत: अनियमिततेवर ते न्यायालयाचा दरवाजा जनहित याचिकेच्या माध्यमातून ठोठावतात. राज्यात काँग्रेसची सत्ता असतानाच्या काळातही त्यांनी अनेकदा सरकारच्या विरोधात याचिका केल्या आहेत. यावेळी भाजपची सत्ता असल्याने भाजपने वडपल्लीवार यांना लक्ष्य केले आहे. राज्यातील बिकट आर्थिक परिस्थितीकडे बोट दाखवणारी याचिका त्यांनी दाखल केली आहे. सार्वजनिक हिताची कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडे रक्कम शिल्लक राहात नाही,याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

हेही वाचा…यवतमाळात मुसळधार, अनेक गावांत पाणी शिरले; पैनगंगा नदीला पूर

भाजपने वडपल्लीवार यांच्यावर ते काँग्रेस कार्यकर्ते असल्याचा आरोप केला आहे. ते नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते तर सुनील केदार यांच्याशी त्यां चा निकटचा संबंध आहे, असा आरोपही भाजप नेत्यांनी केला आहे. शनिवारच्या महिला मेळाव्यात बोलताना फडणवीस म्हणाले “ मी उच्च न्यायालयात मोठा वकील उभा करेल पण लाडकी बहीण योजनेला स्थगिती देऊ देणार नाही.”. एकनाथ शिंदे यांनीही वडपल्लीवार यांच्यावर टीका केली ते म्हणाले “ लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी ते न्यायालयात गेले, पण त्यांना यश मिळणार नाही.

याबाबत वडपल्लीवार यांचे म्हणने असे आहे की, मी न्यायालयात गेलो नाही. मी यावर लवकरच माझ स्पष्ट म्हणने मांडणार आहे. प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. वकिलाचा सल्ला घेत आहे. कोणाचाही स्वीय सहाय्य कमी नव्हतो, असा दावा वडपल्लीवार यांनी केला आहे.

हेही वाचा…अजितदादांनी दुसऱ्यांदा संघ भूमीवर जाणे टाळले, काय आहे कारण?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, अनिल वडपल्लीवार हे काँग्रेस पक्षासोबत नाही. त्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही. लाडकी बहीण योजना मुळातच फसवी आहे. बहिणीच्या हातून १०० रुपये काढून घ्यायचे आणि तिला पाच रुपये परत करायचे. महागाई वाढली आहे. अशा फसव्या योजनेसाठी सत्ताधारी पक्षाकडून पैशाची उधळपट्टी सुरू आहे.