नागपूर : देशात महाराष्ट्र पोलीस दल आधुनिक आणि डिजिटल करण्याच्या प्रयत्न शासनाने केला आहे. देशातील सर्वात आधुनिक ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ नागपुरात बनवण्यात आले आहे. येथे शासकीय विभागाचे ३६०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि मेट्रो, बसस्थानक, रेल्वेस्थानकासह काही खासगी प्रतिष्ठानाचे असे ५८०० सीसीटीव्ही कॅमेरे जोडलेले आहेत. त्यामुळे शहरात कोणताही गुन्हा घडल्यास तो उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना आता कठीण जाणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते नागपूर पोलीस आयुक्तालयाच्यातर्फे आयोजित ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’चे लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर पोलिसांनी विविध गुन्ह्यांत जप्त केलेला मुद्देमालाचे फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच ‘सीम्बा’ नावाच्या ॲपचेही लोकार्पण करण्यात आले. नागपूर पोलिसांकडे असलेल्या नव्या तंत्रप्रणालीमुळे शहरात कुठेही घडलेल्या गुन्ह्यातील गुन्हेगाराला अगदी काही मिनिटात पकडता येईल. एवढेच नव्हे तर पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला असून चेहरे ओळखणारे आणि आवाजावरून गुन्हेगार ओळखणारे आणि शरीराच्या हालचालींवरून व्यक्ती ओळखणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. पोलिसांना आता गुन्हेगार आणि टोळ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होईल. १५ वर्षांपूर्वीच्या छायाचित्रावरून आताचा गुन्हेगार ओळखण्याचे तंत्र पोलिसांनी आत्मसात केले आहे. ५ हजार ८०० सीसीटीव्हीद्वारे शहरात नियंत्रण ठेवण्यात येत आहे. ड्रोन कॅमेऱ्यांनाही सेंटरला जोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, पोलीस आयु्क्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी, स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल उपस्थित होत्या.

हेही वाचा >>> कोकणानंतर आता ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा….वाचा कुठे आहे ‘ऑरेंज अलर्ट’..?

सायबर गुन्हेगारांवर नियंत्रण

नागपुरात रोज ४० लाखांपेक्षा जास्त रुपयांची सायबर गुन्हेगार फसवणूक करतात. मात्र, आता सायबर पोलीस ठाण्याला सक्षम केले असून अनेकांचे पैसे परत मिळाले आहेत. अनेकांचे गेलेले पैसे बँकांमध्ये गोठवून परत केले आहेत. सामान्य नागरिकांना न्याय मिळत असल्यामुळे पोलिसांवरील जनतेचा विश्वास वाढत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >>> नागपूरचे व्यापारी ‘या‘ समस्येने आहे भयग्रस्त, कारणही आहे धक्कादायक…

चोरी गेलेले दागिने परत मिळाले आईचे दागिने चोरी गेले होते. पोलिसांत तक्रार केली. परंतु, एवढे दिवस होऊनही चोराचा पत्ता लागला नव्हता. त्यामुळे दागिने परत मिळण्याची आम्ही आशा सोडून दिली होती. एका पोलीस कर्मचाऱ्याचा अचानक फोन आला आणि त्याने चोरी गेलेले दागिने सापडले असून ते घेऊन जा, असा संदेश दिला. सुरुवातीला विश्वास बसला नाही. आज आईचे दागिने परत मिळाल्यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदित झाले, अशी भावना सुधीर जैन नावाच्या फिर्यादीने व्यक्त केली. घरी कुणी नसताना घरफोडी झाली आणि चोरट्यांनी सर्व दागिने-पैसे चोरून नेले. वाठोडा पोलिसांनी दोन दिवसांत चोराला अटक केली आणि आमचा मुद्देमाल जप्त केला, असे प्राजक्ता लाखे हिने सांगितले. तर पल्लवी वानखडे म्हणाली की, कळमना पोलिसांनी घरफोडी झाल्यानंतर स्वत:हून आम्हाला मदत केली आणि चोरीचे दागिने परत केले. अपेक्षा नसताही पोलिसांनी केलेल्या कार्यामुळे आनंद होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis inaugurated indias most advanced command and control centre in nagpur adk 83 zws