नागपूर: अर्थसंकल्पातील काहीच कळत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी आणि आजही सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेवर मी उत्तर देण्याचे काहीच कारण नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी रात्री नागपुरात आले असता ते विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलत होते. अजित पवार यांनी  सादर केलेला अर्थसंकल्प हा दिलासा देणारा असून या अर्थसंकल्पातील प्रत्येक योजना अस्तित्वात आणल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका केली जाते आणि ती आजपर्यंतची परंपरा आहे. त्यामुळे त्याच्याकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही. उद्धव ठाकरे यांनी तर मला अर्थसंकल्पातील काहीच कळ‌त नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी केलेल्या टिकेला वर मी उत्तर देण्याचे काहीच कारण नाही असेही फडणवीस म्हणाले. महायुतीमध्ये कुठलेही वाद नसून आगामी विधानसभा निवडणुका आम्ही एकत्र लढणार आहोत. त्या दृष्टीने आम्ही तयारीला लागलो असल्याचे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >>>गडचिरोली : उपचारात हलगर्जीपणा भोवला ! बालकाच्या मृत्यू प्रकरणी कंत्राटी डॉक्टर बडतर्फ; लोकसत्ताच्या वृत्ताची दखल

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे निर्णय मागील एक वर्षात घेतला आहे. नऊ हजार मेगावॅट फिडर हे सोलरवर केले. तीन महिन्यांमध्ये सहा हजार मेगावॅट फिडर आणले जाईल. यामुळे तीन रुपये प्रमाणे सरकारला वीज मिळेल. पुढच्या चार वर्षात शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ शकू. पुढील दोन वर्षे फक्त अधिकचा भार आमच्यावर येणार आहे. कापसाचे आणि सोयाबीनचे भाव जे कमी झाले. त्या संदर्भात साडेचार हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी लाडकी बहन योजना राबविण्यात आली असल्याचे फडणवीस म्हणाले.

कापूस सोयाबीनबाबतचा निर्णय आम्ही कॅबिनेटमध्ये पूर्वी घेतला होता. मात्र आचारसंहिता लागल्यामुळे त्याची अंमलबजावणी करता  आला नाही. शिवाय तरतूद करता आली नाही, आता तरतूद करण्यात आली आहे. हा पैसा मी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देणार आहे. दुधालाही पाच हजार रुपये प्रति लिटर देण्याचा निर्णय घेतला असल्याचे फडणवीस म्हणाले.

पीक विमाचे जवळपास जवळपास सात हजार कोटी रुपयाची मदत दिलेली आहे. ती शेतकऱ्यांच्या खात्यात जात आहे. अजूनही एक हजार कोटीची मदत दिली जाणार आहे. त्यात काही दावे वादग्रस्त असून त्या संदर्भातील निर्णय केंद्र सरकार घेईल. मात्र तेही लवकर निकाली काढून शेतकऱ्यांना न्याय देणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना पंधरा हजार कोटी रुपये दिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis statement on uddhav thackeray criticism of the budget vmb 67 amy