गोंदिया : महाराष्ट्र राज्यात काल दसरा सण साजरा करीत असताना मुंबईत बाबा सिद्दिकी यांच्या कार्यालयात त्यांच्यावर गोळीबार झाल्याची आणि त्यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घडलेली ही अतिशय दुःखद व गंभीर अशा प्रकारची घटना आहे.

बाबा सिद्दिकी यांच्याशी राजकीय संबंध तर होतेच माझी स्वतःची निकटची मैत्री देखील होती. अनेक वर्षे आम्ही सोबत काम केलं त्यामुळे अशा प्रकारे जी घटना घडली आहे त्यामुळे आम्हा सगळ्यांना धक्का बसलेला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

रविवार 13 ऑक्टोबरला गोंदिया जिल्ह्यातील तिरोळा येथे विविध विकास कामाचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्याकरिता ते आले होते. माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्ये विषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आतापर्यंत या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून दोन आरोपी पकडण्यात आले आहेत.

हे ही वाचा…‘एमपीएससी’च्या रखडलेल्या पदांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा, आचारसंहितेपूर्वी…

त्यांच्यावर कसून चौकशी मुंबई पोलीस पथकाकडून केली जात आहे काही धागेदोरे त्यातले पोलिसांनी मिळालेले आहेत तिसऱ्या आरोपीच्या शोधात पोलीस पथकाची चार पथके इतर राज्यात जाऊन चौकशी करीत आहे एक पथक इंदूर तर एक पथक उज्जैनला पाठविण्यात आलं आहे. काही इतरही अँगल्स त्यातले पोलिसांना लक्षात येत आहेत पण त्या संदर्भात आता लगेच बोलणे योग्य होणार नाही आज त्या अटक मध्ये असलेल्या आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे त्यानंतर त्या संदर्भात जेवढी माहिती देता येणार तेवढी माहिती पोलीस ब्रीफिंग करतील आणि त्या संदर्भातील सगळी माहिती पोलीस देणार असल्याचीही माहिती फडणवीस यांनी दिली.

काल घडलेल्या या घटनेनंतर विरोधक सरकारवर टीका करीत आहेत या प्रश्नाच्या उत्तरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला असं वाटते की विरोधकांना केवळ सत्ताच पाहिजे आहे. राज्यात इतकी दुर्दैवी आणि गंभीर घटना झाल्यावर विरोधकांच्या नजरेसमोर फक्त खुर्चीच आहे. आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या विकास आहे. आम्हाला महाराष्ट्राच्या सुरक्षे कडे पाहायचा आहे त्यामुळे ते खुर्चीकडे पाहतायेत त्यांनी खुर्चीकडे बघावे आणि जे बोलायचे आहेत ते बोलावे आम्ही आमच्या काम योग्य पद्धतीने करीत आहोत आम्ही त्यांची पर्वा करीत नाही असेही फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा…‘गांजाचे पान प्रतिबंधित नाहीच, केवळ फूले…’उच्च न्यायालयाचे मत

याप्रसंगी फडणवीस यांच्यासोबत तिरोडाचे आमदार विजय रहांगडाले, गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे माजी आमदार राजेंद्र जैन, भाजप नेते मदन पटले, तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पिंटू रहांगडाले आदि उपस्थित होते.