नागपूर: चार वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार वितरण खोळंबले असून सरकारने ते तातडीने करावे, अशी मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघाने केली आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराचे व इतर पुरस्काराचे वितरण दरवर्षी करण्यात येते परंतु ४ वर्षांपासून पुरस्काराचे वाटप करण्यात आले नाही. सामाजिक न्याय विभागाने याबाबत अलीकडेच जाहिरात प्रकाशित केली होती.
१/८/२०२३ ते १५ /८/२०२३ पर्यंत अर्ज मागवले होते. त्या प्रमाणे शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्ज सादर केले. मात्र अद्याप पुरस्कारांची घोषणा व वितरण झाले नाही. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ही निवेदन देण्यात आले होते. परंतु काहीच झाले नाही. एकीकडे भारतीय संविधान घटनेचे शिल्पकार व भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उदोउदो करायचा व एकीकडे त्यांच्या नावावर असलेल्या पुरस्काराचे ४ वर्षांपासून वितरण करावयाचे नाही ही कुठली नीती आहे ॽ असा सवाल डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघाचे योगेश वागदे, सरचिटणीस भूषण दडवे यांनी केले होते.