अनिल कांबळे
नागपूर : कुटुंबात नोकरी करणारी किंवा उच्चशिक्षित सून आणून समाजात प्रतिष्ठा उंचावून तोरा मिरविण्यासाठी अनेक कुटुंब सरसावतात. मात्र, भरोसा सेलमध्ये धाव घेणाऱ्यांमध्ये आर्थिक सक्षम असलेल्या महिलांचा मोठा टक्का आहे. अशा प्रकरणात कमावत्या महिलांचा घटस्फोटाकडे सर्वाधिक कल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या तक्रारींवर सहानुभूतीपूर्वक विचार करून कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन करून समेट घडवून आणण्याचे काम करणाऱ्या भरोसा सेलमध्ये गेल्या २०१७ पासून ते मार्च २०२४ पर्यंत १५ हजार १३२ महिलांनी तक्रारींची नोंद केली. सर्वच तक्रारी कौटुंबिक स्वरुपाच्या असल्यामुळे समस्या जाणून घेऊन समूपदेशनातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. १३ हजार १८४ शिक्षित महिलांचा समावेश आहे. या महिला तक्रारदारांमध्ये सरकारी नोकरी किंवा खासगी नोकरी करणाऱ्या आणि उच्चशिक्षित महिलांचा टक्का मोठा आहे.

आणखी वाचा-नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी

आर्थिक सक्षम असलेल्या महिलांना संयुक्त कुटुंबात राहण्यात रस नसल्याचे अनेक प्रकरणातून दिसून आले. तसेच काही नोकरदार किंवा उच्चशिक्षित महिला भरोसा सेलमध्ये येण्यापूर्वीच वकिलांशी सल्ला-मसलत करीत असतात. सासू-सासरे, दिर-ननंद असलेल्या संयुक्त कुटुंबात राहण्याचा काही महिलांचा कल नसल्याचे दिसून आले तर काही राजा-राणीचा संसारालाच महत्व देत असल्याचे लक्षात आले. सासू-सासरे नकोच असणाऱ्यांमध्ये नोकरी किंवा खासगी व्यवसाय करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे.

त्यामुळे भरोसा सेलमध्ये येणाऱ्या तक्रारदार महिला कायदेशिररित्या सल्ला घेऊन थेट घटस्फोटाकडे वळलेल्या असतात. आतापर्यंत नोकरी करणाऱ्या ५५१ महिलांनी भरोसा सेलमध्ये कौटुंबिक हिंसाचार झाल्याची तक्रार केली आहे. तर खासगी नोकरी करणाऱ्या ७७९ महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, समूपदेशनानंतरही अनेकींचा कल घटस्फोटाकडे गेल्याची नोंद आहे. शिक्षित महिलांच्या प्रमाणात अशिक्षित, अल्पशिक्षित असलेल्या महिलांचे प्रमाण खूपच कमी आहे. आतापर्यंत केवळ २२९ अशिक्षित महिलांनी कौटुंबिक त्रास असल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. तसेच अशा प्रकरणात केवळ समूपदेशन करून कौटुंबिक समेट झाल्याची अनेक प्रकरणे आहेत.

आणखी वाचा-विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव

आर्थिक सक्षम, उच्चशिक्षित महिला माहेरी भावनिकरित्या जुळलेल्या असतात. सासरी नांदताना कौटुंबिक वाद किंवा किरकोळ तक्रारीवरही माहेरची मंडळी थेट पोलिसात जाण्याचा सल्ला देतात. तर अनेकदा पती-पत्नीच्या संसारात माहेर किंवा सासरची मंडळी विनाकारण लुळबूळ करीत असल्याने संसार विस्कटण्याच्या मार्गावर असतो. पोलीस-समूपदेशकांकडून बऱ्याच उच्चशिक्षित आणि आर्थिक सक्षम महिलांची समजूत घालून अनेक संसार पुन्हा रुळावर आल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

कुटुंबांनी ठरविलेल्या विवाहानंतर किंवा प्रेमविवाहानंतर पती-पत्नीचा सुखी संसार सुरु असतो. मात्र, लहानसहान गोष्टीवरून वाद झाल्यानंतर सुखी संसाराला अहंकारामुळे ग्रहण लागते. मात्र, भरोसा सेलमध्ये पती-पत्नीच्या मनातील पूर्वग्रह आणि अहंकाराचे निरसन करून समूपदेशानंतर संसार पुन्हा सुरळीत करण्यात यश आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divorce tendency of financially capable women adk 83 mrj