अकोला : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ५० टक्क्यांची प्रकल्पग्रस्तांमधून पदभरती करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गट ड संवर्गातील ५२९ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी १० मार्चपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील कृषी विद्यापीठातील गट-ड संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी ५० टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठातील बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत, त्या प्रकल्पबाधित कुटुंबामधुन प्रकल्पग्रस्तांचा सरळसेवेचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, चौकीदार, माळी, व्हाॅलमन, मत्स्य सहायक व मजुर संवर्गाची एकूण ५२९ रिक्त पदे सरळसेवेने भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक १० मार्चपासून उपलब्ध राहणार आहे.

पदभरतीमध्ये प्रवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षण लागू राहणार आहे. प्रयोगशाळा परिचरचे एकूण ३९ पदे भरली जाणार असून वेतन श्रेणी एस ६ १९९०० – ६३२०० राहील. परिचरची ८० रिक्त पदे भरली जाणार असून वेतन श्रेणी एस १ १५००० – ४७६०० राहणार आहे. चौकीदारची ५० पदे, ग्रंथालय परिचरची ५ पदे, माळीचे आठ पदे, मत्ससहाय्यक एक पद भरले जाईल. या सर्व पदांसाठी वेतन श्रेणी एस १ १५००० – ४७६०० प्राप्त होईल. व्हॉलमनची दोन पदांची भरती होणार असून त्यांना एस ३ १६६०० – ५२४०० ही वेतन श्रेणी मिळणार आहे. मजुरांची सर्वाधिक ३४४ पदांची भरती होणार आहे. मंजुर पदासाठी नियुक्त उमेदवारांना वेतन श्रेणी एस ३ १५००० – ४७६०० प्राप्त होईल.

पदभरतीसाठी ऑनलाइन परीक्षा

प्रयोगशाळा परिचर, परिचर, ग्रंथालय परिचर व व्हॉलमन या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात परीक्षा घेतली जाणार आहे. वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात घेतली जाईल. प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.