अमरावती : मेळघाटातील रंगूबेली, धोकडा, कुंड, किन्‍हीखेडा, खोकमार आणि खामदा या सहा गावांमध्ये मतदान केंद्रांवर गावातील एकही नागरिक फिरकला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे या गावातील मतदान केंद्र ओस पडले आहे. ग्रामस्थांनी मतदान करावे, यासाठी प्रशासनाकडून बरेच प्रयत्न करण्‍यात आले, मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या गावांमध्‍ये एकूण १ हजार ३०० मतदार आहेत.

हेही वाचा…गडचिरोलीत १११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान, तरुण मतदारांना…

सर्वच मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावामध्ये रोड, पाणी, नाल्या, वीज या संदर्भात समस्या आहेत. या समस्या न सुटल्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. आधी सोयी सुविधा द्या, मग मतदान मागायला या अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी मेळघाटातील चार गावांनी मतदानावर बहिष्‍कार टाकला होता. यात यावेळी दोन गावांची भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी रंगूबेली, धोकडा, कुंड आणि खामदा येथील गावकरी मतदान केंद्रांवर फिरकले नव्‍हते.

मेळघाटात अतिदुर्गम भागात वसलेल्या या चारही गावांना जोडणाऱ्या रस्‍त्‍यांची दुर्दशा झाली आहे. या गावात कुठले वाहन देखील पोहोचू शकत नाही, अशी अवस्था आहे. यासह वीज पुरवठा या चारही गावांमध्ये नाही, पिण्याचे पाणी देखील नाही. यासह आरोग्य सेवा देखील या गावांमध्ये उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी आणि निवेदने सादर करून देखील गावाच्या कुठल्याही प्रश्नांसंदर्भात कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे या चारही गावातील ग्रामस्थांनी आम्ही मतदान करणार नाही, आमचा निवडणुकीवर बहिष्कार आहे, अशी भूमिका घेतली आहे. नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनाकडून नागरिकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्‍यात आले. मात्र गावकरी बहिष्‍काराच्‍या भूमिकेवर ठाम आहेत. जिल्‍ह्यात शांततेत मतदान

हेही वाचा…राणा दाम्‍पत्‍य दुचाकीने मतदान केंद्रावर…

आज सकाळी ७ वाजतापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांनी केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली. अमरावती जिल्ह्यातील विधानसभेच्या आठही मतदारसंघांमध्ये मतदानासाठी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले आहेत. जिल्ह्यात सकाळी पहिल्या दोन तासात ६.०८ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाला वेग आला. सकाळी ११ वाजेपर्यंत १७.४५ टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदान केंद्राबाहेरील रांगांमध्ये वाढ झाली. दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाच्या पहिल्या सहा तासांमध्ये अमरावती जिल्ह्यात सरासरी ३१.३२ टक्के मतदान झाले आहे. ६५ टक्‍क्‍यांच्‍या वर मतदानाचा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to boycott of voting by villagers of melghat polling station in this village dried up mma 73 sud 02