नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेतून ४१७ उमेदवारांची निवड झाली. या उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात आली आहे. असे असतानाही मागील १० महिन्यांपासून त्यांना नियुक्ती मिळालेली नाही. तर दुसरीकडे राज्यसेवा उत्तीर्ण झालेल्या ६२३ उमेदवारांच्या निवडीचे प्रकरणचही प्रलंबित आहे.

त्यांच्याही न्यायालयीन प्रकरणांचा निवडा झाला असून नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोन्ही परीक्षांच्या नियुक्तीसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर आज अखेर कृषी सेवा परीक्षेतील ४१७ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहेत. आचारसंहितेपूर्वी नियुक्ती पत्र मिळाल्याने उमेदवारांनी दिलासा मिळाला असून त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.

हेही वाचा >>> ‘सीबीएसई’ प्रमाणे स्टेट बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल, कॉपी करून उत्तीर्ण होण्याच्या….

न्यायालयाच्या निर्णयानंतर काय घडले?

कृषी सेवेच्या याचिकेसंदर्भातील याचिका फेटाळल्यानंतर संबंधित निवड झालेल्या उमेदवारांनी कृषी विभागामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता न्यायालयीन निकाल आल्यानंतर नियुक्तीची उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान एक आठवडा तरी लागू शकतो, असे सांगण्यात आले. यानंतर उमेदवारांनी आंदोलन केले. तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचीही अनेकदा भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात मध्यस्थी करून नियुक्तीसाठी पूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांच्या नियुक्त्या मार्गी लागणार आहेत. तसेच ६२३ उमेदवारांची अंतिम निवड यादीही लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा >>> भांडण की दंगामस्ती! ताडोबातील ‘छोटी तारा’ पाठोपाठ आता तिचे बछडेही…

संदेश व्हायरल

कृषी विभागाच्या उमेदवारांना नियुक्ती मिळात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. अनेक महिन्यांपासून त्यांनी यासाठी संघर्ष केला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतरही नियुक्ती मिळत नसल्याने त्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनाही अनेकदा निवेदन दिले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्यक्ष या प्रकरणात लक्ष दिले. त्यानंतर हा प्रश्न सुटल्याने विद्यार्थ्यांकडून विविध समाज माध्यमांवर धन्यवाद देवा भाऊचे संदेश व्हायरल केले जात आहेत.

आचारसंहितेपूर्वी नियुक्त्या मिळाल्याने आनंद

राज्यात लवकरच आचारसंहित जाहीर होणार आहे. त्यापूर्वी या उमेदवारांना नियुक्ती न मिळाल्यास पुन्हा त्यांचा प्रश्न गंभीर होणार आहे. दोन महिने पुन्हा विलंब होणार असल्याने स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे उमेश कोर्राम यांनीही लवकरच नियुक्त्या द्याव्या अशी मागणी केली होती. या उमेदवारांना आचारसंहितेपूर्वी नियुक्त्या मिळल्याने त्यांनीही सरकारचे आभार मानले.

न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे या नियुक्त्या रखडल्या होत्या. या प्रकरणातील दोन्ही याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या नियुक्त्या अंतिम कराव्या अशा सूचना विभागाला दिल्या होत्या. आचारसंहितेपूर्वी नियुक्ती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. आज अखेर यश आल्याने आनंद आहे. –धनंजय मुंडे, कृषीमंत्री.