बुलढाणा : जुलै मध्यावरही जिल्हयातील लहान मोठ्या धरणातील जलसाठ्याची स्थिती गंभीर असल्याचे गंभीर चित्र आहे.तब्बल १७ लघु सिंचन प्रकल्प कोरडेच आहे. खडकपूर्णा  धरणात शून्य टक्के जलसाठा असून बहुतेक धरणातील जलसाठ्याची टक्केवारी चिंताजनक आहे.

काल परवा खामगाव तालुक्यात पडलेला कोसळधार पाऊस वगळता यंदाच्या पावसाळ्यात सर्वदूर मध्यम स्वरूपाचाच पाऊस झाला आहे. नदी नाले एक करणारा पाऊस केवळ एकमेव खामगाव तालुक्यात झाला आहे.वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६१.६ मिलिमीटर च्या तुलनेत ११ जुलै अखेर जिल्ह्यात २६८ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे. जळगाव जामोद (३३५ मिमी) आणि नांदुरा ( ३०५ मिमी) तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित अकरा तालुक्यात २२६ ते २६९ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला आहे.

हेही वाचा >>>‘माऊंट मकालू’वर भारताच्या तिरंग्यासह महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा; शिवाजी ननावरेंनी गाठले जगातील पाचवे उंच ठिकाण

यामुळे जिल्ह्यातील लहानमोठ्या धरणातील जलसाठ्याची आकडेवारी चिंताजनक आहे.  तब्बल १७ लघु धरण उन्हाळ्यासारखे कोरडे ठाक आहेत. तांबोळा, हिरडव,गुंधा, केशव शिवणी, मांडवा, वरवंड, पिंपळगाव चिलम, फत्तेपुर,कळमेश्वर,  अंभोरा, पिंपळनेर,  लोणवडी, विद्रुपा, तांदुळवाडी, लांजुड, पळशी, धनवटपुर या प्रकल्पाचा समावेश आहे.उर्वरित धरणातही फारशी समाधानकारक स्थिती नाही.

खडकपूर्णात शून्य जलसाठा

 जिल्ह्यातील मोठा (बृहत) प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा धरणात अजूनही जलसाठा उपलब्ध झाला नाही. धरणात मृतजल साठाच उपलब्ध असल्याचे चित्र आहे. पेन टाकळी धरणात जेमतेम ७.१४ टक्के तर  नळगंगा मध्ये ३० टक्के साठा आहे.सात मध्यम प्रकल्पातील जलसाठा देखील फारसा समाधानकारक नाही. तोरणा १०.५२टक्के, उतावळी १७.२३ टक्के, मन १२.६५ टक्के, कोराडी १४.५५ या धरणात देखील अपेक्षित जलसाठा उपलब्ध झाला नाहीये!  ज्ञानगंगा प्रकल्पात  ३३.६० तर  पलढग मध्ये ४६.६० टक्के जलसाठा आहे.

हेही वाचा >>>‘लाडकी बहीण’चा भार, मागण्यांकडे दुर्लक्ष करते सरकार; महसूल कर्मचारी वैतागले

या तुलनेत केवळ मस धरणात ७१.६८ टक्के असा समाधानकारक जलसाठा आहे. कालपरवा खामगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि आवार महसूल मंडळात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे या धरणातील पाणी पातळी वाढली आहे.

पावसाळ्यातही पाण्यासाठी हाल

दरम्यान जुलै मध्यावरही जिल्हयातील किमान ३ लाख ग्रामीण राहिवासीयांचे पाण्यासाठी होणारे बेहाल कायम आहे. अजूनही ६१ गावांची तहान  ६५ टँकरद्वारे  भागविली जात आहे.  २७९ गावांना  ३३५ अधिग्रहित खाजगी विहीरिद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. चिखली, मेहकर आणि बुलढाणा या तीन तालुक्यातील पाणी टंचाईची तीव्रता जास्त आहे. जुलै महिन्यातही ग्रामस्थांची होरपळ, भटकंती कायम असल्याचे विचित्र चित्र आहे.