अकोला : मध्य रेल्वेकडून गेल्या पाच महिन्यांत ५७ लांब पल्ल्याच्या मालवाहतूक गाड्या चालविल्या जात आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यामुळे रेल्वे विभागांमध्ये क्षमतेच्या कमतरतेच्या समस्येवर अतिशय प्रभावी उपाय मिळतो. अधिक गाड्यांसाठी ‘लूप लाईन’ तयार केली जात आहे. यामध्ये भुसावळ विभागातून २३, तर नागपूर विभागातून ३४ लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जात आहेत. यामुळे मालवाहतुकीला मोठी चालना मिळाली आहे. मध्य रेल्वेने आतापर्यंत दोन मालवाहू गाड्यांचा समावेश असलेल्या ५७ लांब पल्ल्याच्या मालवाहू गाड्या चालवल्या आहेत.
गत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये मध्य रेल्वेने १०८ लांब पल्ल्याच्या गाड्या चालवल्या होत्या. त्या सर्व नागपूर विभागातून सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे अधिक ‘लूप लाईन्स’ची सुविधा निर्माण केली जात आहे. मध्य रेल्वेच्या प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात कोणतीही अडचण न आणता आणखी लांब पल्ल्याच्या मालवाहू गाड्या चालविण्यात येणार आहेत.
लांब पल्ल्याच्या गाड्या मालवाहू गाड्यांच्या सामान्य रचनेपेक्षा दुप्पट लांब असतात. एका मालगाडीच्या सुमारे ५० वॅगन आणि दोन गाड्यांच्या एकूण १०० वॅगन्स एकत्र जोडलेल्या असतात. या लांब पल्ल्याच्या मालवाहतूक गाड्या चालवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये अति व्यस्त मार्गांवर मार्गाची बचत करणे, विभागांचा जास्तीत जास्त उपयोग, वेग असल्याने वेळेत बचत, क्रूमध्ये बचत, ‘अनलोडिंग’ आणि ‘लोडिंग’ अति सुलभ होते, ‘वॅगन टर्नअराउंड’ वेळ वाढते आदींचा समावेश आहे.
या लांब पल्ल्याच्या मालवाहू गाड्या इतर वाहतुकीवर परिणाम न करता चालवल्या जात आहेत. या लांब पल्ल्याच्या मालवाहतूक गाड्या मालवाहतूक करण्यास मोठी चालना देतात. प्रथमच भारतीय रेल्वेने ७ ऑक्टोबर २०२१ रोजी दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर दोन लांब पल्ल्याच्या मालवाहू गाड्या यशस्वीपणे चालवल्या आहेत. या लांब पल्ल्याच्या मालवाहू गाड्या भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक गाड्यांच्या सामान्य रचनेपेक्षा दुप्पट किंवा त्याहून अधिक लांब आहेत. यातून मालवाहतुकीला नक्कीच चालना मिळू शकते, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
‘लूप लाइन’चे कार्य प्रगतीपथावर
मध्य रेल्वेच्या सध्या नागपूर विभागातील अजनी यार्ड आणि भुसावळ यार्ड येथून लांब पल्ल्याच्या मालवाहू गाड्या चालविल्या जात आहेत. लांब पल्ल्याच्या मालवाहू गाड्यांसाठी अधिक ‘लूप लाईन’ तयार करून ‘लोडिंग’ आणि ‘अनलोडिंग’साठी सुविधा वाढविल्या जात आहेत.
विशेष ‘ब्लॉक’मध्ये मूर्तिजापूर येथे लांब पल्ल्याच्या लूपचे बांधकाम पूर्ण केले जात आहे. नांदगाव (मनमाडजवळ), माहेजी (जळगावजवळ) आणि बोरगाव (अकोलाजवळ) येथे आणखी तीन लांब पल्ल्याच्या मालवाहतूक लूप लाइन तयार करण्याचे काम सुरू आहे.