अमरावती : वंचित बहुजन आघाडीने ‘लोकशाही गौरव महासभे’च्‍या माध्‍यमातून नुकतेच केलेले शक्तिप्रदर्शन, रिपब्लिकन पक्षाच्‍या गवई गटाची सज्‍जता, रिपब्लिकन सेनेचे अध्‍यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी स्‍वत: निवडणूक लढण्‍यासाठी सुरू केलेली चाचपणी यामुळे अमरावती मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाच्‍या विविध गटांनी पेरणी सुरू केल्‍याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप, काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे प्रत्‍येकी दोन गट अशा सहा पक्षांत महाराष्‍ट्राचे राजकारण विकेंद्रित झालेले असताना या तीव्र सत्‍तास्‍पर्धेत रिपब्लिकन पक्षाच्‍या विखुरलेल्‍या गटांनी देखील अस्तित्‍व दाखविण्‍याची धडपड सुरू केली आहे.

हेही वाचा – दोन वर्षांनंतर राहुल गांधी आणि स्मृती इराणी एकाच वेळी अमेठीत; लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापणार?

गेल्‍या निवडणुकीत काँग्रेस, राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍यावर अपक्ष नवनीत राणा या ५ लाख १० हजार ९४७ मते मिळवून निवडून आल्‍या होत्‍या. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ४ लाख ७३ हजार ९९६ मते प्राप्‍त झाली होती. वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे यांना ६५ हजार १३५ मते मिळाली होती. रिपाइं गवई गटाने नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता. अमरावती जिल्‍ह्यात आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पक्षाचे महत्‍व यापूर्वीही दिसून आले आहे. रिपाइंला फाटाफूट आणि गटबाजीचा इतिहास असला, तरी निवडणूक निकालावर प्रभाव टाकण्‍याची क्षमता रिपाइं गटांमध्‍ये आहे.
अमरावती मतदारसंघात ७१ टक्के हिंदू मतदार असून त्यात कुणबी बहुसंख्य आहेत. काही विधानसभा मतदारसंघांमध्ये माळी समाजाची मते निर्णायक ठरत आली आहेत. अनुसूचित जातीच्या मतदारांचे प्रमाण १८ टक्के, त्यात बौद्धांचे प्रमाण १३ टक्के आहे. अनुसूचित जमातीच्या मतदारांचे प्रमाण १४ टक्के आहे. याशिवाय सुमारे १४ टक्के मुस्लीम मतदारांचा कौल निकालावर प्रभाव टाकणारा ठरू शकतो. त्‍यामुळेच प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीवर अधिक लक्ष केंद्रित केल्‍याचे दिसून येते.

वंचित बहुजन आघाडी आपला परीघ वाढविण्‍याच्‍या प्रयत्‍नात असताना रिपाइं गवई गट मात्र अजून चाचपडतच आहे. अद्यापपर्यंत महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून आघाडीत सहभागी होण्याबाबत आपल्याला लेखी पत्र आलेले नाही. महाविकास आघाडीकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्यास महायुतीचाही पर्याय आमच्यासमोर खुला असेल. दोन्‍ही आघाड्यांकडून आपल्याला साथ मिळाली नाही, तर अमरावतीसह पाच लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी आमची असेल, असे रिपाइंचे (गवई गट) राष्ट्रीय सरचिटणीस डॅा. राजेंद्र गवई यांचे म्‍हणणे आहे. त्‍यांच्‍या भूमिकेकडे आता अनेकांचे लक्ष आहे. राजेंद्र गवई यांनी यापूर्वीही काँग्रेसच्‍या विरोधात उघड भूमिका घेतली आहे.

हेही वाचा – कोकणातील निवडणुकीला राणे- भास्कर जाधव संघर्षाची किनार

दुसरीकडे, रिपब्लिकन सेनेचे अध्‍यक्ष आनंदराज आंबेडकर हे गेल्‍या दोन वर्षांपासून सातत्‍याने अमरावतीचा दौरा करीत आहेत. लोकसभेच्‍या अमरावती आणि लातूर या दोन जागा रिपब्लिकन सेना लढविणार असल्‍याची घोषणा त्‍यांनी केली आहे. आपण अमरावतीतून निवडणूक लढवावी, अशी स्‍थानिक कार्यकर्त्‍यांची इच्‍छा असल्‍याचे त्‍यांचे म्‍हणणे आहे. इंडिया आघाडीत सहभाग मिळावा, अशी त्‍यांची अपेक्षा आहे.

गेल्‍या महिन्‍यात येथील सायन्‍स कोर मैदानावर पार पडलेल्‍या जंगी जाहीर सभेतून प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकल्‍याचे चित्र दिसले. गेल्‍या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. अमरावती जिल्‍ह्यात वंचित आघाडीने आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा जागांवर निवडणूक लढविली. चार ठिकाणी ‘वंचित’चे उमेदवार हे तिसऱ्या स्‍थानी होते. त्‍यामुळे पक्षाची सौदा करण्‍याची क्षमता वाढली आहे. काँग्रेसची जिल्‍ह्यात रिपाइं गवई गटासोबत परंपरागत युती राहिली. पण, अलीकडच्‍या काळात गवई गट काँग्रेसपासून अंतर ठेवून आहे. रिपब्लिकन पक्षाचे इतरही गट निवडणुकीच्‍या पूर्वतयारीत गुंतलेले आहेत. प्रकाश आंबेडकर, राजेंद्र गवई, आनंदराज आंबेडकर हे कोणती भूमिका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष राहणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eye of republican groups on amravati lok sabha constituency print politics news ssb
Show comments